वसई : अतिवेगाने वाहने चालविणे, मद्यपान करून वाहने चालविणे, वाहनावरील नियंत्रण सुटणे, रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या अशा विविध प्रकारच्या कारणामुळे अपघाताच्या घटना समोर येत असतात. मीरा भाईंदर व वसई विरार आयुक्तालयाच्या क्षेत्रात पाच महिन्यात रस्ते अपघातात ७३ जणांचा मृत्यू झाला आहे. विशेषतः राष्ट्रीय महामार्गावर ३१ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

वाढत्या शहरीकरणासोबतच वाहनांची संख्या ही बेसुमार वाढली आहे. त्यामुळे वसई विरार व मीरा भाईंदर मध्ये राष्ट्रीय महामार्ग, अंतर्गत रस्ते, राज्य मार्ग अशा विविध ठिकाणच्या रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी दिसून येत आहे. मात्र काही वाहनचालक हे बेफिकीर पणे वाहने चालवीत असतात तर काही जण अतिघाईने वाहने चालविल्याने अपघात घडू लागले आहेत.

विशेषतः मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघात होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. अशा घडणाऱ्या गंभीर स्वरूपाच्या अपघातामुळे अनेकांचा मृत्यू होण्याच्या घटना ही समोर येत आहेत. नुकताच अर्नाळा येथेही अबोली रिक्षाला एसटीची धडक लागून प्रवासी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यामुळे पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वाढते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांमार्फत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणे, जनजागृती करणे अशा विविध उपक्रम राबविले जातात. मात्र वाहन धारक त्या नियमांचे दुर्लक्ष करतात त्यामुळे अपघाताच्या घटना समोर येत आहे.

जानेवारी ते मे २०२५ या पाच महिन्यांच्या कालावधी मध्ये मीरा भाईंदर व वसई विरार मध्ये ३१० अपघाताच्या घटना घडल्या आहेत. यात शहरांतर्गत रस्त्यावर २२२, राष्ट्रीय महामार्गावर ८३ व राज्य मार्गावर ५ असे अपघात घडले आहेत यात ७३ जणांचा मृत्यू झाला आहे तर २०८ जण गंभीर जखमी झाले आहेत. तर ६३ जण किरकोळ जखमी झाली असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे. बहुतांश अपघातात दुचाकीस्वारांचे झाले असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे.

राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग मुंबई, ठाणे, पालघर, गुजरात यासह विविध भागांना जोडणारा महत्त्वाचा महामार्ग समजला जातो. मात्र या महामार्गावर वाहनांवरील नियंत्रण सुटणे, काही भागात रस्त्याची झालेली लेन कटिंग, रस्ते ओलांडून प्रवास, खड्ड्यांमुळे घडलेले अपघात, चिखलाचे साम्राज्य, बेकायदेशीर छेद रस्ते, रस्त्याच्या मध्येच उभ्या केलेल्या वाहनांना धडका लागणे, अपुऱ्या दुभाजक, अवजड वाहनांचा विरुद्ध दिशेने प्रवास, पथदिव्यांचा अभाव, अशा विविध कारणांमुळे अपघात घडत आहेत. या पाच महिन्यात ३१ जणांचा महामार्गावर मृत्यू झाला त्यामुळे एकप्रकारे मृत्यूचा सापळा बनला असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांकडून अपघात रोखण्यासाठी प्रयत्न

दरवर्षी विविध प्रकारच्या कारणामुळे रस्ते अपघाताच्या घटना घडत असतात. रस्ते अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण कमी व्हावे यासाठी वाहतूक विभाग व अन्य पोलीस यंत्रणा ही प्रयत्न करीत आहे. अपघात घडल्यानंतर अपघात ग्रस्ताला तात्काळ मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असतात. सद्यस्थितीत पावसाळा सुरू झाला त्यामुळे अनेक भागात खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालविताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.