वसई : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरव महामार्गालगतच्या परिसरात आग दुर्घटना व इतर आपत्कालीन परिस्थितीत अडचणी निर्माण होतात. अशा वेळी या भागात तातडीने मदत मिळावी यासाठी महापालिकेकडून वसई फाटा येथे नवीन अग्निशमन उपकेंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. पालिकेचे हे ८ वे उपकेंद्र आहे.
वसई विरार शहराच्या पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. या महामार्गावर अग्निसुरक्षा व आपत्कालीन मदतीच्या दृष्टीने सुविधा नसल्याने अडचणी येत होत्या. याशिवाय मागील काही वर्षांपासून महामार्गालगतचा परिसर हा वेगाने विकसित होऊ लागला आहे. औद्योगिक कारखाने, उपहार गृहे, गोदामे, बैठ्या चाळी इतर आस्थपना यामुळे हा परिसर ही अधिक दाटीवाटीचा बनला आहे.अनेकदा महामार्ग व त्या लगतच्या भागात कारखान्यांना आगी लागण्याच्या घटना घडतात. तर महामार्गावर काही वेळा चालत्या वाहनांना आगी, विचित्र अपघात, ऑइल गळती, गॅस गळती असे प्रकार ही घडतात.
अशा वेळी वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले जाते. परंतु सुरवातीला अस्तिवात असलेली अग्निशमन केंद्र शहरी भागाच्या व आतील भागात आहेत. त्यामुळे महामार्गावर आग दुर्घटना व इतर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास महामार्गावर पोहचण्यास विलंब होत होता. काही वेळा घटनेची माहिती मिळाल्यानंतर वाहतुक कोंडी व दूरचे अंतर यामुळे अग्निशमन दलाचे वाहन पोहचण्यास अडचणी येत होत्या. यासाठी आता महापालिकेकडून वसई विरार महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या महामार्गाजवळ नवीन अग्निशमन केंद्र तयार करण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानुसार महापालिकेने वसई फाटा येथील डिमार्ट जवळ नवीन अग्निशमन उपकेंद्र सुरू करण्यात आले आहे.पालिकेच्या अग्निशमन विभागाचे हे आठवे उपकेंद्र असून या केंद्रामुळे महामार्ग व त्या परिसरात आगीची किंवा इतर कोणती आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास त्यावर नियंत्रण मिळविण्यास मोठी मदत होणार असल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे.
महामार्गावर व त्या आजूबाजूच्या भागात आग दुर्घटना आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून त्या ठिकाणी उपकेंद्र सुरू केले आहे. या केंद्रामुळे त्या भागातील आपत्कालीन स्थिती नियंत्रणास मोठी मदत होईल- दिलीप पालव, अग्निशमन दल प्रमुख वसई विरार महापालिका
तात्पुरता जागेचा तिढा सुटला
अग्निशमन केंद्र सुरू करण्यासाठी मागील चार ते पाच वर्षांपासून पालिकेचे प्रयत्न सुरू होते. मात्र जागेअभावी केंद्र उभारण्यास अडचणी येत होत्या. मात्र महामार्गावरील समस्या लक्षात घेत केंद्र उभारणे अत्यंत महत्वाचे बनले होते.
त्यामुळे वसई फाटा जवळील शासकीय जागेत उपकेंद्र तात्पुरता स्वरूपात सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या केंद्रासाठी ही जागा मिळावी यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
अशी आहे सुविधा
महापालिकेकडून महामार्गावर वर्सोवा पुलापासून ते पालघर पर्यंत सेवा दिली जाणार आहे. विशेषतः पेल्हार, वसई फाटा, जूचंद्र, चिंचोटी अशा भागात आग लागल्यास वेळीच नियंत्रण मिळविता येणार आहे. या केंद्रात पालिकेने १९ अग्निशमन दलाचे कर्मचारी नियुक्त केले असून या केंद्रात जलद प्रतिसाद वाहन, अग्निबंब, अग्निशमन देवदूत वाहन, बुलेट वाहन, एक चारचाकी अशी पाच वाहने व रेस्क्यू साहित्य उपलब्ध ठेवण्यात आले आहे.
महामार्गावरील आगीच्या प्रमुख घटना
१) ३ ऑगस्ट रोजी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर हायड्रोजन वाहतूक करणारा ट्रक उलटून आग दुर्घटना. त्यातून होणाऱ्या गॅस गळतीमुळे सुमारे १५ तासाहून अधिक काळ वाहतूक ठप्प होऊन नागरिकांचे हाल झाले होते.
२) ४ जानेवारी २०२४ मध्ये स्कॉरपीओ वाहनाला सातविली खिंडीत भीषण आग
३) १७ फेब्रुवारी २०२५ ला मालजीपाडा आणि खानिवडे येथे कंटेनरला आग.