वसई: वसई विरार महापालिकेच्या कार्यक्षेत्रात आरोग्यदृष्ट्या संवेदनशील असे दोनशेहून भाग असून अशा ठिकाणी पावसाळ्यात विविध प्रकारचे साथीचे आजार पसरण्याची शक्यता असते. या आरोग्य विषयक समस्यांचे निवारण करण्यासाठी महापालिकेचा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे.

या जोखीम ग्रस्त भागांची तपासणी , गप्पी मासे केंद्र, यासह इतर सोयीसुविधा उपलब्ध करण्यावर भर दिला जात आहे.

पावसाळ्यात जलजन्य, किटकजन्य आदी आजारांची साथ परसण्याची शक्यता असते. याशिवाय ताप, सर्दी, खोकला, असे आजार पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे आरोग्य विभागाने शहरातील रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र येथील आरोग्य कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेऊन योग्य ते नियोजन करण्याबाबत सूचना केल्या जात आहेत.

पावसाळ्यात नैसर्गिक, मानवनिर्मित आपत्तीचा धोका उद्भवण्याची शक्यता अधिक असते. मागील वर्षी सुद्धा शहरात पूरस्थिती जन्य परिस्थिती निर्माण झाली होती.  यंदाही अशा आपत्ती काळात सेवा पुरविण्यासाठी रॅपिड रिस्पॉन्स पथक तयार ठेवण्यात आले आहे. तर पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या आजारांबाबत नागरिकांनी काळजी घ्यावी यासाठी जनजागृती करण्यास असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.

पावसाळ्यात कावीळ, हगवण, लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यू, मलेरियासारखे व इतर साथ आजार तसेच चक्रीवादळ, मुसळधार पाऊस, भूस्खलन, पूरजन्य परिस्थिती, सर्प व विंचू दंश यांसारख्या घटना घडतात. अशा सर्व बाबी लक्षात घेता  रुग्णालयात पुरेसा औषध साठा, जिवाणू संसर्ग प्रतिबंध गोळ्या संच, खाटा, रुग्णवाहिका अशा सुविधा सज्ज ठेवल्या जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने दिली आहे.

श्वान दंशावरील ७ हजार लसी व सर्प व विंचू दंशावरील १ हजार लसींचा साठा ही उपलब्ध असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.

संवेदनशील भागांवर विशेष लक्ष

वसई विरारचा बहुतांश भाग दाटीवाटीचा भाग आहे. काही ठिकाणी गटाराचे पाणी रस्त्यावरच असते, तर काही ठिकाणी पाण्याचे पिंप अनेक दिवसांपासून भरून ठेवले जातात.

मागील तीन वर्षात अशा भागातून मलेरिया व डेंग्यूचे रुग्ण आढळून आले होते. अशा भागांना संवेदनशील भाग म्हणून घोषित करून त्या ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. सध्या स्थितीत २०० अशी ठिकाणे आहेत त्याठिकाणी आरोग्य पथकाकडून तपासणी केली जात आहे. विशेषतः बांधकामाच्या ठिकाणी मजूर राहतात त्यांची तपासणी त्या ठिकाणी साचून राहिलेल्या पाण्याची तपासणी अशा उपाययोजना केल्या जात आहेत.

५० ठिकाणी गप्पी मासे केंद्र

पावसाळ्यात साचून राहिलेल्या पाण्यात डासांच्या अळ्यांची उत्पत्ती होत असते. याच पार्श्वभूमीवर साथरोग नियंत्रण आणि डासांच्या अळ्यांचा नायनाट करण्यासाठी वसई विरार भागात विविध ठिकाणी गप्पी मासे सोडण्याची मोहीम राबविली जात आहे. यात जवळपास ५० ठिकाणी अशी केंद्र तयार केली जातील.यात मोठे हौद व तलाव यांचा समावेश आहे. पावसाळ्याच्या अनुषंगाने महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साथीचे आजार पसरतात त्याबाबत जनजागृती, तपासणी औषधोपचार अशा सर्व बाबीचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. – डॉ भक्ती चौधरी,  मुख्य वैद्यकीय अधिकारी महापालिका