जैवविविधतेच्या साखळीत वाघ जेवढा महत्त्वाचा, तेवढाच किंबहुना त्याहूनही अधिक महत्त्वाचा पक्षी! जैवविविधता, पर्यावरण आणि निसर्गातील बदलाची तो सूचना देतो. त्यामुळे वाघांसाठी तर ‘टायगर सेल’, गेंडय़ासाठी ‘ऱ्हायनो सेल’, हत्तीसाठी ‘एलिफंट सेल’ स्थापन केले जाऊ शकतो, तर पक्ष्यांसाठीसुद्धा ‘बर्ड सेल’ असायला हवे, असे प्रामाणिक मत ज्येष्ठ पक्षी अभ्यासक डॉ. अनिल पिंपळापुरे यांनी व्यक्त केले. लोकसत्ताला दिलेल्या विशेष भेटीत त्यांनी एकूणच महाराष्ट्राच्या पक्षीवैभवाचे अंतरंग उलगडले.
अतिशय संकटग्रस्तांच्या यादीतील माळढोकचे राज्यातील विशेष अभ्यासक डॉ. पिंपळापुरे यांनी माळढोकच्या एकूणच वाटचालीविषयी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, संपूर्ण भारतात १०० ते १५० आणि महाराष्ट्रात अवघ्या १५ ते २० च्या घरात माळढोक शिल्लक आहे. त्याच्या रक्षणासाठी सोलापूर जिल्ह्यात खास नानज अभयारण्य तयार केले, पण या अभयाण्यातील आजची माळढोकची संख्या अवघी तीन आहे. अभयारण्यातच ही स्थिती असेल तर राज्यातल्या इतर क्षेत्रातील त्याच्या स्थितीविषयी न बोललेलेच बरे! पैसा करोडोने खर्च करून पक्षी वाचत नाही. त्यासाठी व्यवस्थापन नीट असायला हवे. वरोरा आणि भद्रावती परिसरात १४ माळढोक असल्याची वनखात्याची आकडेवारी बोलते. प्रत्यक्षात ते ७-८ च्याच घरात आहेत. या परिसरात त्याचा वावर असताना त्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी घेणे आवश्यक होते. २०१० मध्ये वनोजा परिसरात माळढोकची चार घरटी आढळली. त्यातील अंडय़ातून पिले बाहेर येण्याच्या बेतात असतानाच रस्त्याला लागून अवघ्या १०० फुटावर पाईपलाईनच्या कामाचा परिणाम त्याच्यावर झाला आणि अंडी नासली. चार माळढोक जन्माला येण्याआधीच त्यावर मृत्यू ओढवला. आज जे काही माळढोकचे वास्तव्य या परिसरात शिल्लक आहे, त्याच्या सुरक्षिततेसाठी लगेच पावले उचलली नाहीत तर आजूबाजूचे प्रकल्प या उर्वरित माळढोकचा बळी घेतील. येत्या दहा वर्षांत माळढोक पूर्णपणे नामशेष होतील, अशी भीती डॉ. पिंपळापुरे यांनी यावेळी व्यक्त केली.
महाराष्ट्रातील इतर पक्ष्यांबाबतही अशीच काहीशी स्थिती आहे. महाराष्ट्रात ५५० पक्ष्यांच्या प्रजाती आहेत. सारस, माळढोक, रानपिंगळ्यासह त्यातील ४०-५० पक्षी अतिशय संकटग्रस्तांच्या यादीत आहेत. पक्ष्यांच्या स्थलांतरणावरून जैवविविधता, पर्यावरण, निसर्गातील बदलाचा अंदाज येतो. या बदलाचे सूचकच जर नष्ट होण्याच्या मार्गावर असतील तर त्यासाठी ‘बर्ड सेल’ असायलाच हवे. गरूड फक्त ताडोबातच, रानपिंगळा फक्त मेळघाटातच आणि माळढोक वरोऱ्यातच, अशी ओळख असताना अतिशय संकटग्रस्तांच्या यादीतील या पक्ष्यांचे संरक्षण ही वनखात्याची जबाबदारी आहे, हेही त्यांनी अधोरेखित केले.