२ आवर्तने व कालवा समिती बैठकीची मागणी
गोदावरी कालव्यांना तातडीने पाण्याची दोन आवर्तने मिळाली पाहिजे व कालवे सल्लागार समितीची बैठक तातडीने बोलवा, या मागणीसाठी माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली उद्या (गुरुवार) सकाळी ९ वाजता कोपरगाव तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.
गोदावरी कालवे पाटपाणी संघर्ष समितीने हा इशारा दिला आहे. यासंदार्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, दरवर्षी गोदावरी कालव्याचे रब्बी व उन्हाळी हंगाम पाणी पुरवण्याचे धोरण ठरविण्यासाठी कार्यकारी अभियंत्याच्या (नाशिक पाटबंधारे विभाग) अध्यक्षतेखाली गोदावरी डावा कालवा व गोदावरी उजवा कालवा सल्लागार समित्यांची स्वतंत्र बैठक होते. यंदा मात्र अद्यापि ही बैठक घेण्यात आलेली नाही. परिणामी शेती उद्ध्वस्त होत आहे.
सिन्नर, निफाड, येवला, कोपरगाव, राहाता या तालुक्यांसाठी गोदावरी नदीकाठच्या भागात कुठेही लहान-मोठे धरण बांधण्यास जागा नाही. या भागातील संपूर्ण शेती गोदावरी कालव्यांवर निर्भर आहे. असे असताना या परिसरातील ६८ हजार ८०० एकर क्षेत्रावरील फळबागा व ३६ हजार एकर क्षेत्रावर ऊसाला पाणी मिळालेले नाही. कालवा सल्लागार समितीची बैठक न होताच जायकवाडीसाठी या धरणातून तीन टीएमसी पाणी सोडून नदीद्वारे पुरविले आहे. वास्तविक हे पाणी पुरविताना जे लाभार्थी शेतकरी आहे त्यांच्याही पिकांचे संरक्षण म्हणून व या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न समजून ही बैठक घेऊन हा प्रश्न सोडवावयास पाहिजे तथापि, जलसंपदा विभागाने या बाबत कुठलीही कृती न करता आम्हा शेतक ऱ्यांना आजवर अंधारात ठेवले. याबाबत आम्ही वेळोवेळी निवेदने, रास्ता रोको आंदोलने करूनही त्या खात्याने कानावर हात ठेवले. म्हणूनच उद्या लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असून त्यात शेतकऱ्यांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीने केले आहे.