सिडकोच्या विकास आराखडय़ात मोडणाऱ्या उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड परिसरातील गावात समुद्राच्या भरतीच्या पाण्याने शिरकाव केला असून त्यामुळे गावागावात घरांचे प्रचंड मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. भरतीचे पाणी येऊ नये यासाठी सिडकोने एकूण पाच साठवणूक तलावांची (होिल्डग पौंड) निर्मिती केली आहे. यापैकी चार तलाव गाळाने तुडुंब भरल्याने त्याचा फटका ग्रामस्थांना बसत आहे. साठवणूक तलाव गाळाने तुडुंब भरल्याने त्याच्या पाण्याची दरुगधी व मच्छरपासून होणाऱ्या आजारांना ग्रामस्थांना सामोरे जावे लागत आहे. यावर वेळीच उपाययोजना केली नाही तर भविष्यात मोठय़ा संकटाला सामोरे जावे लागेल अशी भीती येथील ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
सिडकोच्या विकास आराखडय़ात मोडणाऱ्या उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड परिसरातील गावातील मूळचा नैसर्गिक पाण्याचा स्रोत बंद झाल्याने समुद्राच्या भरतीचे पाणी गावात येऊ नये यासाठी सिडकोने एकूण पाच साठवणूक तलावांची निर्मिती केली आहे. यापैकी चार तलाव गाळाने तुडुंब भरले आहेत. तलावातील गाळावर खारफुटी निर्माण झाल्याने गाळ काढण्यासाठी खारफुटीचा अडसर निर्माण झाला आहे. खारफुटी हटविण्याची मागणी करणारी याचिका सिडकोने दोन वर्षांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर निकाल न लागल्याने उरण तालुक्यातील अनेक गावांना समुद्राच्या भरतीचे पाणी येऊ लागले आहे. तालुक्यातील शेतीवर मातीचा भराव टाकण्यात आला आहे. त्यामुळे शेतीतील पाण्याचा निचरा होण्यासाठी असलेले नैसर्गिक नाले बंद पडले आहेत. दर पंधरा दिवसांनी होणाऱ्या समुद्राच्या भरतीचे पाणी थेट उरण तालुक्यातील नवघर, पागोटे, कुंडेगाव, भेडखळ, बोकडवीरा, फुंडे आदी गावांत शिरत आहे. त्यामुळे या गावातील अनेक घरांचेही नुकसान झाले आहे. तीन ते चार वर्षांपूर्वी अशाच प्रकारे भरतीचे पाणी समुद्र सपाटीपासून सखल भागात असलेल्या कुंडे गावात शिरल्याने अनेक घरांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. तसेच या गावात शिरलेल्या भरतीच्या पाण्यात बुडून एका अडीच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली होती. असेच प्रकार पुढेही घडण्याची भीती ग्रामस्थ येथे व्यक्त करीत आहेत.
सध्या नवघर गावातील परिसरात भरतीचे पाणी शिरले आहे. हे पाणी सिडकोने बसविलेल्या नाल्याचे फ्लॅप मच्छीमारांनी उघडे ठेवल्याने शिरले असल्याचे मत सिडकोचे द्रोणागिरी नोडचे कार्यकारी अभियंता पी.एम.शेवतकर यांनी व्यक्त केले आहे. सिडकोकडून गावातील पाणी काढण्यासाठी पंप लावण्यात आल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे. साठवणूक तलावातील गाळामुळे तलावांची साठवणूक क्षमता कमी झाली असून हे प्रकरण न्यायालयात असल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे.

सिडकोचे नियोजन कुचकामी
सिडकोने विकासाच्या नावाने उरण तालुक्यातील अनेक नैसर्गिक नाले मातीच्या भरावाने बुजवून टाकल्याने,पावसाचे तसेच समुद्राच्या भरतीच्या पाण्याच्या निचऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी सिडकोने नियोजन करून करोडो रुपये खर्चाची डच देशाच्या धर्तीवर साठवणूक (होिल्डग पौंड)तलाव तयार केलेले होते. नवघर, भेंडखळ, फुंडे, डोंगरी आदी गावांच्या शेजारी तयार केलेल्या या तलावात अल्पावधीतच मातीचा गाळ साचला आहे. त्यामुळे ही योजना कुचकामी ठरल्याची संतप्त प्रतिक्रिया येथे व्यक्त होत आहे.