मन:सामर्थ्यांच्या जोरावर आयुष्यात यश आणि कीर्ती प्राप्त होत असते. मन संस्कारित असेल तर ते प्रगती साधण्यासाठी शिडीसारखे उपयुक्त ठरते.  असंस्कारित मन हे सापाप्रमाणे घात करणारे असते. त्यामुळेच संस्कारांच्या नियंत्रणात असलेल्या मनाच्या साहाय्याने उत्कर्ष शक्य असते, असे प्रतिपादन जीवन विद्या मिशनचे प्रल्हाद वामनराव पै यांनी नवी मुंबईमध्ये केले.
 जीवन विद्या मिशनचे प्रणेते सद्गुरू वामनराव पै यांच्या प्रेरणेने सीवूड येथील यशवंतराव चव्हाण मैदानात दोनदिवसीय प्रबोधनपर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रल्हाद पै यांनी ‘दृष्टी उत्कर्षांची’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. माणसाचे विचार उच्चस्थानी नेण्याचे काम जीवनविद्या मिशनने केले आहे. उत्कर्षांसोबत उन्नती असेल तर प्रगती साधता येते. उत्कर्षांकडे बघण्याची दृष्टी बदलली की सुख आणि समाधान मिळू शकते, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. या प्रसंगी ठाण्याचे पालकमंत्री गणेश नाईक, खा. डॉ. संजीव नाईक यांच्यासह नवी मुंबईतील मान्यवर मंडळी या कार्यक्रमास उपस्थित होती. खा. संजीव नाईक यांनी सद्गुरू वामनराव पै यांनी जनतेला आत्मविश्वासाची ताकद दिली, अशा वंदनीय व्यक्ती पुन्हा होणे नाही त्यामुळे त्यांच्या विचारांची शिदोरी जपण्याची गरज आहे.
जात, धर्म हा भेद विसरून कार्यरत राहण्याची शिकवण पै यांनी दिली असून त्यांच्या इच्छेनुसार कर्जत येथे आध्यात्मिक केंद्र तयार झाले आहे. तर कामोठे येथे देखील मार्गदर्शन केंद्र उभे राहात असल्याने त्याचा साधकांना चांगला उपयोग होऊ शकणार आहे. तर गणेश नाईक यांनी वामनराव पै यांच्या मार्गदर्शनामुळेच आपल्याला आत्मविश्वासाने काम करण्याची प्रेरणा मिळाली असे यावेळी सांगितले.