गाडी कोणतीही असो, अपघातानंतर त्या वाहनांचा चेंदामेंदा ठरलेला असतो. असा अपघात झाल्यास अनेकांना जीवही गमवावा लागतो. नवी मुंबईतील ‘पाम बीच’ मार्गावर सुमारे २०० किमी वेगाने सुसाट सुटलेल्या मर्सिडीजला झालेला अपघात अनेकांच्या अंगावर काटा आणणारा ठरला. त्यामुळे धूम स्टाइलने वाहने चालविण्याची मजा काही और असली तरी तुमचा जीवही तितकाच महत्त्वाचा, असा संदेश देण्यासाठी ठाण्याच्या वाहतूक पोलिसांनी अनोखी शक्कल लढविण्याचे ठरविले आहे. घोडबंदर येथील भीषण अपघातात चेंदामेंदा झालेली स्कॉर्पियो गाडी ठाणे, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ या शहरांमध्ये फिरविण्यात येणार असून या अपघाताचे भीषण वास्तव ठाणेकरांना याचि देही याचि डोळा पाहता येणार आहे. ठाणे वाहतूक पोलिसांकडून ३ ते १७ जानेवारी या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये मद्यपान करून वाहन चालवू नये, असा संदेश देण्यात येणार आहे. हा संदेश ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या शहरातील नागरिकांपर्यंत पोहोचावा, यासाठी वाहतूक पोलिसांनी विविध प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मद्याच्या नशेत झिंगणाऱ्या चालकांकडून अपघात होण्याची शक्यता असते. तसेच अशा चालकांमुळे इतर निष्पाप नागरिकांचेही जीव धोक्यात येतात. वेगाशी स्पर्धा करू पाहणारे अनेक वाहनचालक अपघाताने बळी पडतात. त्यामध्ये अनेकांना जीव गमवावे लागतात. त्यामुळे मद्यपान करून वाहन चालवू नका आणि वेगाशी बरोबरी करू नका, असा संदेश वेगळ्या संकल्पनेतून मांडण्याचा प्रयत्न वाहतूक पोलिसांनी केला आहे. घोडबंदर भागात दोन महिन्यांपूर्वी भरधाव स्कॉर्पिओ चालकाचा ताबा सुटला आणि अपघात झाला. त्यामध्ये एका व्यक्तीला जीव गमवावा लागला होता. हा अपघात इतका भयानक होता की, त्यामध्ये स्कॉर्पिओ गाडी तीन ते चार वेळा उलटली. या अपघातात स्कॉर्पियोचा चेंदामेंदा झाला. अपघाताचे भयानक वास्तव दाखविण्यासाठी या गाडीचा पुरेपूर वापर करण्याचा ठाणे पोलिसांचा प्रयत्न असणार आहे. नवी मुंबई पोलिसांनी यापूर्वी राबविलेल्या अशा प्रकारचा प्रयोग भलताच यशस्वी ठरल्याचे उदाहरण आहे. हाच प्रयोग आता ठाणे आयुक्तालयात राबविण्यात येणार आहे. ही दोन्ही वाहने एका ट्रकवरून संपूर्ण ठाणे आयुक्तालय परिसरात फिरविण्यात येणार आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
“एखादी गाडी महागडी असली आणि तिच्यात अत्याधुनिक अशी यंत्रणा असली तरी वेगावरचे नियंत्रण सुटल्यास तिचाही अपघात होतो हे ठसविण्याचा वाहतूक पोलिसांचा प्रयत्न आहे. त्यामुळे महागडी गाडी घेतली म्हणजे आपल्या जिवाला धोका नाही, असा समज चुकीचा आहे. गाडी कोणतीही असो अपघातात तिचा चेंदामेंदाच होतो. त्यामुळे नागरिकांनी मद्यपान आणि वेगाशी बरोबरी करून वाहन चालवू नये, असा संदेश देण्यासाठी अपघाती स्कॉर्पिओ आणि दुचाकीचे शहरात फिरवून अपघाताचे भयावह वास्तव दाखविण्यात येत आहे. त्यातून नागरिकांनी सुरक्षित वाहन चालवावे, असा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे,”
डॉ. श्रीकांत परोपकारी, पोलीस उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा