*  नवी मुंबईत पाण्याची नासाडी सुरूच
*  इतर शहरे मात्र टंचाईग्रस्त
* ५० दशलक्ष लिटर पाण्यासाठी वाद
मोरबे धरणातील मुबलक पाणीसाठय़ाच्या जोरावर पाणी वापराची अक्षरश: चैन करणाऱ्या नवी मुंबईकरांच्या पाण्यावर ठाणे जिल्ह्य़ातील टंचाईग्रस्त शहरांनी हक्क सांगण्यास सुरुवात केली आहे. मोरबे धरणात मुबलक पाणी असूनही नवी मुंबईतील काही उपनगरांमध्ये आजही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून मिळणाऱ्या पाण्याचा पुरवठा केला जातो. नवी मुंबईत पाण्याची नासाडी सुरू असताना तेथील महापालिकेस पुरविण्यात येणाऱ्या ५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा औद्योगिक विकास महामंडळाने थांबवावा, अशी भूमिका कल्याण-डोंबिवलीसह जिल्हय़ातील आणखी काही प्राधिकरणांनी आक्रमकपणे घेण्यास सुरुवात केली आहे. नवी मुंबईकरांचे पाणी कल्याण-डोंबिवलीतील टंचाईग्रस्त भागांसाठी वळविण्यात यावे, अशी भूमिकाही या भागातील राजकीय पक्षांनी घेतली आहे.
उल्हास नदीतील पाण्याची पातळी कमी झाल्याने लघू पाटबंधारे विभागाने आठवडाभरापासून १५ टक्के पाणी कपात लागू केली आहे. याचा थेट फटका जिल्हय़ातील नागरी भागांना बसला असून ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भाईंदर, अंबरनाथ, बदलापूर अशा सर्वच शहरांमध्ये पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, नवी मुंबई या शहरांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडूनही पाणीपुरवठा केला जातो. उल्हास नदीवर उभारण्यात आलेल्या बारवी धरणातून औद्योगिक विकास महामंडळही पाणी उचलते. त्यामुळे पाटबंधारे विभागाने पाणी कपातीचा निर्णय घेताच औद्योगिक विकास महामंडळानेही तो निर्णय घेतला. त्याचा दुहेरी फटका ठाणे, कल्याण-डोंबिवली यांसारख्या शहरांना बसू लागला आहे. या दोन्ही शहरांमध्ये आठवडय़ातून दोन वेळा पाण्याचे शट डाऊन घेण्याचा निर्णय तेथील प्राधिकरणांनी घेतला आहे.
एकीकडे जिल्हय़ातील प्रमुख शहरांमध्ये पाणी कपातीचे संकट ओढवले असताना दुसरीकडे नवी मुंबईत मात्र पाण्याचा दौलतजादा सुरू आहे. सिडको वसाहतीमधील सुमारे ५२ हजार कुटुंबांना ५० रुपयांमध्ये महिन्याला ३० हजार लिटर पाणी पुरवठय़ाचा धोरणात्मक निर्णय सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. यामुळे या वसाहतींमध्ये पाण्याची अक्षरश: नासाडी सुरू असून शहरात प्रति माणसी सुमारे ३५० लिटर इतका पाणी वापर सुरू असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. मोरबे धरणातील पाण्याची क्षमता ४५० दशलक्ष लिटर इतकी आहे. या धरणातून नवी मुंबईतील वेगवेगळ्या उपनगरांना दररोज ४१० दशलक्ष लिटर इतका पाण्याचा पुरवठा होत असतो. या मुबलक पाणीसाठय़ामुळे नवी मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट नाही. असे असताना नवी मुंबई महापालिकेने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कोटय़ातील ५० दक्षलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा कायम ठेवल्याने जिल्हय़ातील टंचाईग्रस्त शहरांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होऊ लागला आहे.
औद्योगिक विकास महामंडळाकडून मिळणारे पाणी ऐरोली, दिघा तसेच घणसोलीतील काही पट्टय़ात वितरित केले जाते. मोरबे धरणातील मुबलक पाणीपुरवठय़ाच्या जोरावर नवी मुंबईत पाण्याचा दौलतजादा सुरू असताना औद्योगिक विकास महामंडळातील कोटय़ातील ५० दशलक्ष लिटर पाण्यावर हक्क सांगण्याचा नैतिक अधिकार नवी मुंबई महापालिकेस नाही, असा टोला कल्याण-डोंबिवली महापालिकेतील एका वरिष्ठ राजकीय पदाधिकाऱ्याने वृत्तान्तशी बोलताना हाणला. अजित पवार उपमुख्यमंत्री असताना त्यांनी नवी मुंबईच्या कोटय़ातील पाणी कल्याण-डोंबिवलीस द्यावे, असे आदेश औद्योगिक विकास महामंडळास दिले होते.
अद्याप या आदेशाची पूर्तता झालेली नाही, असेही या पदाधिकाऱ्याने सांगितले. ५० दशलक्ष लिटर पाणी इतर शहरांकडे वळविल्यास तेथील नागरिकांना दिलासा मिळू शकेल, असा दावाही या पदाधिकाऱ्याने केला.