भारताचा डाव २०१ धावांत कोसळला
मोहालीत पहिल्या दिवशी फिरकीचा ‘एल्गार’ पाहायला मिळाला, परंतु तो भारतापेक्षा अधिक जोषपूर्ण दक्षिण आफ्रिकेचा होता. पाहुण्यांचा कामचलाऊ फिरकी गोलंदाज डीन एल्गरचा होता. नाणेफेक जिंकल्यावर अनुकूल वातावरणाचा लाभ घेण्यात भारताला अपयश आले. भारताचा पहिला डाव फक्त २०१ धावांत गुंडाळण्यात सिंहाचा वाटा उचलणारा एल्गार पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा नायक ठरला.

सलामीवीर मुरली विजयने अर्धशतकी खेळी उभारून भारताच्या डावात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर उत्तरार्धात भारताच्या फिरकी गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेची २ बाद २८ अशी स्थिती करून दिलासा दिला. स्टियान व्हान झिल (५) आणि फॅफ डू प्लेसिस (०) हे तंबूत परतले असून, एल्गर (खेळत आहे १३) आणि कर्णधार हशिम अमला (खेळत आहे ९) मैदानावर आहेत. फिरकीला साथ देणाऱ्या पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या खेळपट्टीवर पहिल्या दिवशी १२ फलंदाज बाद झाले, यापैकी ९ बळी फिरकी गोलंदाजांना मिळाले.
आघाडीचा ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विनने भारताच्या गोलंदाजीला प्रारंभ केला. त्याने झिलला पायचीत केले, तर जडेजाने त्याच्या पहिल्याच षटकात डू प्लेसिसचा त्रिफळा उडवला.

त्याआधी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण शिखर धवन शून्यावर बाद झाला. मग विजय आणि चेतेश्वर पुजारा (३१) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी रचून भारतीय डावाला स्थर्य देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ठरावीक अंतराने भारताचे फलंदाज बाद होत गेले. मग जडेजा (३८) आणि अश्विन (नाबाद २०) यांनी आठव्या विकेटसाठी ४२ धावांची भागीदारी केल्यामुळे भारताला किमान दोनशे धावांचा टप्पा गाठता आला. डावखुरा फिरकी गोलंदाज एल्गरने २२ धावांत ४ बळी घेत भारतीय फलंदाजांची परीक्षा पाहिली.
व्हर्नन फिलँडरचा (२/३८) उसळणारा चेंडू तटवण्याच्या प्रयत्नात धवनच्या बॅटची कड घेऊन चेंडू पहिल्या स्लिपमध्ये कर्णधार हशिम अमलाच्या हाती विसावला. २०१३मध्ये याच मैदानावर धवनने शानदार पदार्पण करताना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत १८७ धावांची झंझावाती खेळी साकारली होती.

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनला (०/३०) यश मिळाले नसले तरी फलंदाजांवर दडपण ठेवण्याचे कार्य मात्र त्याने चोख केले. विजय आणि कोहली हे लागोपाठच्या षटकांमध्ये तंबूत परतले. पदार्पणीय सामना खेळणाऱ्या कॅगिसो रबाडाने कोहलीच्या (१) रूपात आपला पहिला बळी साजरा केला. २७वा वाढदिवस लाजवाब खेळीनिशी साजरा करण्याचे कोहलीचे स्वप्न धुळीस मिळाले. फक्त पाच मिनिटे आणि चार चेंडू त्याला खेळपट्टीवर तग धरता आला.

उपाहारानंतर ३ बाद ८२ धावसंख्येवरून विजय आणि अजिंक्य रहाणे (१५) यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु एल्गरने ३८व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर रहाणेचा आणि ४०व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर वृद्धिमान साहाचा बळी घेत भारताला धक्के दिले.
विजयने कसोटी कारकीर्दीतील १२वे अर्धशतक नोंदवले. त्याने १३६ चेंडूंत १२ चौकारांसह ७५ धावा केल्या. या खेळीत त्याने रहाणेसोबत चौथ्या विकेटसाठी ३७ धावांची आणि जडेजासोबत सहाव्या विकेटसाठी ३८ धावांची भागीदारी केली.
भारतीय फलंदाजांप्रमाणे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनाही फिरकीचा सामना करीत तग धरणे आव्हानात्मक ठरेल. मात्र पहिल्या दिवसअखेरचा अर्धा तास अमला आणि एल्गर यांनी हिमतीने खेळून काढला. कोहलीने तिसरा फलंदाज बाद करण्यासाठी अनेक बदल करून पाहिले, पण त्याला यश मिळाले नाही.

धावफलक
भारत (पहिला डाव) : मुरली विजय पायचीत गो. हार्मर ७५, शिखर धवन झे. अमला गो. फिलँडर ०, चेतेश्वर पुजारा पायचीत गो. एल्गर ३१, विराट कोहली झे. एल्गर गो. रबाडा १, अजिंक्य रहाणे झे. अमला गो. एल्गर १५, वृद्धिमान साहा झे. अमला गो. एल्गर ०, रवींद्र जडेजा पायचीत गो. फिलँडर ३८, अमित मिश्रा झे. स्टेन गो. एल्गर ६, रविचंद्रन अश्विन नाबाद २०, उमेश यादव त्रि. गो. ताहीर ५, वरुण आरोन त्रि. गो. ताहीर ०, अवांतर (बाइज ६, लेगबाइज १, नो बॉल ३) १०, एकूण ६८ षटकांत सर्व बाद २०१
बाद क्रम : १-०, २-६३, ३-६५, ४-१०२, ५-१०२, ६-१४०, ७-१५४, ८-१९६, ९-२०१, १०-२०१
गोलंदाजी : डेल स्टेन ११-३-३०-०, व्हर्नन फिलँडर १५-५-३८-२, सिमॉन हार्मर १४-१-५१-१, कॅगिसो रबाडा १०-०-३०-१, डीन एल्गर ८-१-२२-४, इम्रान ताहीर १०-३-२३-२.
दक्षिण आफ्रिका (पहिला डाव) : डीन एल्गर खेळत आहे १३, स्टियान व्हान झिल पायचीत गो. अश्विन ५, फॅफ डू प्लेसिस त्रि. गो. जडेजा ०, हशिम अमला खेळत आहे ९, अवांतर (लेगबाइज १) १, एकूण २० षटकांत २ बाद २८
बाद क्रम : १-९, २-९
गोलंदाजी : आर. अश्विन ७-३-४-१, उमेश यादव ३-१-५-०, वरुण आरोन ३-१-४-०, रवींद्र जडेजा ५-०-७-१, अमित मिश्रा २-०-७-०.

सत्रनिहाय आकडेवारी
सत्र       षटके बळी धावा
पहिले      २७   ३     ८२
दुसरे        २८  ४      ८६
तिसरे       ३३  ५      ६१

मोहालीची खेळपट्टी आव्हानात्मक आहे. पहिल्या डावातील भारताची धावसंख्या कमी वाटत असली तरी खेळपट्टीचे स्वरुप लक्षात घेता, या धावा पुरेशा आहेत. फलंदाजांना धावांसाठी संघर्ष करावा लागणार आहे. त्यांच्या संयमाची परीक्षा आहे. नव्या पिढीचे फलंदाज फिरकी गोलंदाजांविरुद्ध मोठय़ा प्रमाणावर धोका पत्करून फटके खेळतात. या प्रयत्नात ते बाद होतात. यात काहीच चूक नाही.
संजय बांगर, भारताचे फलंदाजी प्रशिक्षक

कसोटीचा निकाल लागेल अशी मोहालीची खेळपट्टी आहे. परंतु ही खेळपट्टी चांगली नाही असे माझे मत आहे. आमच्याविरुद्ध अशाच खेळपट्टय़ा तयार करण्यात येतील, याची खात्री आहे. चार बळींसह भारतीय संघाचा डाव झटपट गुंडाळण्यात योगदान समाधान देणारे आहे. मात्र खेळपट्टीचे स्वरूप आश्चर्यचकित करणारे होते. या खेळपट्टीवर धावा करणे कठीण आहे.
-डीन एल्गर, दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज