SS Rajamouli on IPL 2025 Final Shreyas Iyer and Virat Kohli : इंडियन प्रीमियर लीगच्या १८ व्या हंगामातील अंतिम सामना आज (०३ जून) अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि पंजाब किंग्स हे संघ प्रथमच स्पर्धेचे जेतेपद पटकावण्यासाठी एकमेकांविरूद्ध उभे ठाकले आहेत. पहिल्या क्वालिफायर सामन्यात बँगलोरने पंजाबला पराभूत करत अंतिम फेरी गाठली होती. तर, पंजाब किंग्सचा संघ दुसऱ्या क्वालिफायरमध्ये मुंबई इंडियन्सविरूद्ध विजय मिळवून अंतिम फेरीत दाखल झाला आहे. जगभरातील क्रिकेटरसिकांचं या सामन्याकडे लक्ष लागलं आहे.

पंजाब आणि बँगलोरचे संघ खूप मेहनत करून अंतिम फेरीत दाखल झाले आहेत. या दोन्ही संघांनी आजवर आयपीएल चषक उंचावलेला नाही. त्यामुळे यंदा आपल्याला नवा आयपीएल विजेता संघ मिळणार आहे. मात्र, या सामन्यात नेमक्या कोणत्या संघाला पाठिंबा द्यावा असा प्रश्न असंख्य क्रिकेटरसिकांना पडला आहे. लोकप्रिय चित्रपट दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांची देखील तीच अवस्था आहे. कारण त्यांना विराट व श्रेयस हे दोन्ही खेळाडू आवडतात. त्यामुळे त्यांनी त्यांच्या भावना एक्सवर एक पोस्ट करून व्यक्त केल्या आहेत.

“तोच या आयपीएल चषकाचा खरा दावेदार”

राजामौली यांनी एक्सवर श्रेयस अय्यर व विराट कोहलीचा हात मिळवतानाचा एक फोटो शेअर केला आहे. यासह त्यांनी श्रेयसचं कौतुक करत म्हटलं आहे की “श्रेयसने बुमराह आणि बोल्टच्या यॉर्कर्सवर थर्ड मॅनच्या दिशेने चांगले फटके लगावले. कौतुकास्पद! या खेळाडूने दिल्लीच्या संघाला अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवलं होतं, तरी त्याला संघातून हटवण्यात आलं. त्यानंतर त्याने कोलकाताच्या संघाला आयपीएलचं जेतेपद मिळवून दिलं. तरी त्याला कोलकाताने वगळलं. आता त्याने पंजाबला अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवलं आहे. ११ वर्षांनंतर पंजाबचा संघ फायनल खेळतोय. त्यामुळे श्रेयस यंदाच्या आयपीएल चषकाचा खरा दावेदार आहे”.

दरम्यान, राजामौली यांनी याच पोस्टमध्ये विराट कोहलीचंही कौतुक केलं आहे. ते म्हणाले, “दुसऱ्या बाजूला विराट कोहली आहे. तो सातत्याने चांगली कामगिरी करतोय. हा अंतिम सामना त्याच्यासाठी खूप मोठी संधी आहे. तो देखील आयपीएल चषकाचा दावेदार आहे. या सामन्याचा निकाल काहीही लागो, आपल्या सर्वांचं मन दुखावणार हे नक्की”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंजाब किंग्सची प्रतिक्रिया

राजामौलींच्या या पोस्टवर पंजाब किंग्सने प्रतिक्रिया दिली आहे. पंजाबने म्हटलं आहे की “प्रिय राजामौली सर, तुमचे शब्द आमच्यासाठी खूप प्रोत्साहन देणारे आहेत. श्रेयसची या स्पर्धेतील कामगिरी तुमच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांसारखी आहे. त्याच्याकडे ‘बाहुबली’सारखं नेतृत्व आहे. तो ‘आरआरआर’सारखा तळपला आहे. त्याने व पंजाबने ‘एगा(मकडी)’स्टाइल कमबॅक केलं आहे. आता क्लायमॅक्स (चित्रपटाचा शेवट) लिहिला जातोय. आम्हाला आशा आहे की या चित्रपटाचा क्लायमॅक्स तुमच्या चित्रपटांच्या दर्जासारखाच असेल.