गतवर्षी तुरडाळीचे दर २०० रुपयांपर्यंत गेल्याने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आले. त्यामुळे यंदा तुरीचे क्षेत्र वाढावे या साठी कृषी विभागाच्या वतीने जनजागृती करण्यात आली. परंतु या आवाहनाला जेमतेम प्रतिसाद मिळाला. मुगाचे क्षेत्र वाढले असले, तरी या वर्षी बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीनवर भर दिल्याचे दिसून आले. या वर्षी १४७ टक्के पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली.
गरीब असो वा श्रीमंत, वरण हा प्रत्येकाच्या जेवणातील अविभाज्य घटक. गेल्या दोन वर्षांपासून कमी पावसामुळे उत्पादनात घट झाली. त्यामुळे डाळीचे भाव कडाडले. त्यामुळे २०० रुपये किलो दराने डाळीची विक्री होत होती. डाळीच्या दरावरुन विरोधी पक्षाने सरकारलाही धारेवर धरले. या प्रश्नावरुन सरकार डळमळते काय, असे चित्र निर्माण झाले. साठेबाजांवर कारवाया झाल्या; परंतु डाळीचे भाव चढेच राहिले. सद्यस्थितीतही १४५ रुपये प्रतिकिलो दराने तुरडाळीची विक्री होत आहे, तर मुगाचे दर ९५ रुपये किलोवर स्थिरावले. डाळीने डोळ्यात पाणी आणल्यानंतर यंदा खरीप हंगामात शेतकऱ्यांनी तूर डाळीची लागवड मोठय़ा प्रमाणात करावी, या साठी जागृती करावी, अशा सूचना सरकारकडून देण्यात आल्या. या अनुषंगाने कृषी विभागाच्या वतीने ग्रामीण भागात तूर डाळ लागवडीबाबत प्रयत्न करण्यात आले; परंतु एकूण क्षेत्राच्या ९७.५ टक्के भागात तुरीची पेरणी झाली. जिल्ह्यात तुरीचे क्षेत्र ६९८.९८ हेक्टर आहे. पकी ६७८.३६ हेक्टरवर पेरणी झाली. कृषी विभागाने केलेल्या आवाहनानुसार मुगाच्या पेरणीत मात्र किंचित वाढ झाल्याचे दिसते. २९९.६३८ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापलीकडे ३०९.९० हेक्टरवर मूग पेरले गेले. उडदाचे क्षेत्र मात्र ३३.१० टक्क्यांनी घटले. एकूण कडधान्य पेरणी ८६.२४ टक्क्यांवर झाली. खरीप ज्वारीचे क्षेत्रही घटले. ११२३.४३८ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापकी ५८७.०९ हेक्टरवरच अर्थात ५२.२६ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. भाताचे क्षेत्र कमालीचे घटले. ४१.९११७ हेक्टरपकी केवळ ४.७८ हेक्टरवरच भाताची पेरणी झाली. मका ९२.९१ टक्के क्षेत्रावर पेरला गेला आहे. जिल्ह्यात बाजरीचे क्षेत्र नाही; परंतु ०.३१ हेक्टर एवढय़ा किरकोळ क्षेत्रावर बाजरी पेरली गेल्याचे कृषी विभागाच्या पेरणी अहवालात नमूद आहे. एकूण तृणधान्याचे सर्वसाधारण क्षेत्र १२०१.००८२ हेक्टर असताना केवळ ६०४.६४ हेक्टरवरच पेरणी झाली. याचे प्रमाण ५०.३४ टक्के भरते.
गळीत धान्याची पेरणी १४१.८६ टक्के एवढी अधिक झाली असली, तरी त्यात सोयाबीनचेच प्रमाण सर्वाधिक आहे. जिल्ह्यात दरवर्षीच सोयाबीनचा पेरा अधिक असतो. तसा तो यंदाही सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा ४६.८६ टक्क्यांनी जास्त आहे. एकूण सर्वसाधारण क्षेत्र १९९०.८९ हेक्टर असताना प्रत्यक्षात २९२३.९२ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. इतर सर्व प्रकारच्या गळीत धान्याच्या पेरणीत मात्र घट दिसून येते.
संग्रहित लेख, दिनांक 25th Jul 2016 रोजी प्रकाशित
तूर, मुगाच्या तुलनेत नांदेडात सोयाबीनच्या क्षेत्रात मोठी वाढ
गतवर्षी तुरडाळीचे दर २०० रुपयांपर्यंत गेल्याने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आले
Written by लोकसत्ता टीम
First published on: 25-07-2016 at 01:05 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A sharp increase in soybean compared tur and moong dal