छत्रपती संभाजीनगर : एक तपापूर्वी शहरातील ‘हॉटेल विट्स’च्या मालमत्तेचे मूल्यांकन ११० कोटी रुपयांपेक्षा अधिक असताना सहाव्या लिलावात ६४ कोटी ८३ लाख एवढ्या कमी किमतीमध्ये ही प्रक्रिया करण्यात आली. या लिलावात सर्वांत अधिक बोली लावण्यामध्ये मे. ‘सिद्धान्त साहित्य खरेदी व पुरवठा कंपनी’ आघाडीवर होती. मात्र, या लिलाव प्रक्रियेत सहभागी झालेल्या तिन्ही कंपन्यांच्या बोलीमधील फरक अत्यल्प असून, विशिष्ट कंपनीला लाभ व्हावा, असा प्रयत्न यामध्ये झाला असून, ही लिलाव प्रक्रिया तत्काळ रद्द करावी तसेच या प्रकरणाची उच्च पातळीवरून चौकशी करावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

शहरातील रेल्वेस्थानक रोडवरील हॉटेल ‘विट्स’ हे धनदा काॅर्पोरेशन लिमिटेड या कंपनीचे आहे. ही कंपनी शेअर बाजारात नोंदणीकृत आहे. या कंपनीचे पाच हजारांहून अधिक भागधारक आहेत. या कंपनीतील ठेवीदारांच्या गुंतवणुकीच्या सुरक्षेसाठी म्हणून सुरू असणाऱ्या न्यायालयीन प्रक्रियेतून हॉटेल लिलावाच्या प्रक्रियेसाठी छत्रपती संभाजीनगरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या हॉटेलच्या विक्रीसाठी ई-लिलाव करण्याची प्रक्रिया २० मे रोजी राबविण्यात आली.

विरोधकांचा आरोप

या लिलावात कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर, लक्ष्मी निर्मल हॉलिडे होम यांनी अनुक्रमे ६४ कोटी ६३ लाख आणि ६४ कोटी ७३ लाख रुपयांची बोली लावली. मात्र, सर्वाधिक बोली ६४ कोटी ८३ लाख असल्याने लिलाव प्रक्रिया ‘सिद्धान्त साहित्य खरेदी व पुरवठा कंपनी’च्या बाजूने झाल्याचे जाहीर करण्यात आले. या किमती लक्षात घेता विशिष्ट कंपनीच्या लाभासाठी ही प्रक्रिया केल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून केला आहे.

ई-लिलाव पद्धतीने सारी प्रक्रिया केली असल्याने वस्तू किंवा मालमत्ता खरेदी करणाऱ्याची क्षमता काय, हे तपासण्याची गरज नव्हती. लिलावाची प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. २५ टक्के रक्कम भरल्याशिवाय यातील पुढची कारवाई करता येणार नाही. रक्कम भरण्यासाठी कंपनीला एक महिन्याची मुदत आहे असे उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड यांनी नमूद केले.

दरम्यान, या लिलाव प्रक्रियेतील घोटाळ्याबाबत बोलताना अंबादास दानवे म्हणाले, ‘हे हॉटेल घेण्यासाठी करण्यात आलेल्या लिलाव प्रक्रियेत हेतू दडले आहेत. ‘सिद्धान्त साहित्य खरेदी व पुरवठा’ ही कंपनी कोणाची आहे. या कंपनीचा लाभ करून देण्यासाठी स्पर्धात्मक लिलाव होऊ दिले नाहीत. त्यामुळे लिलाव प्रक्रियेची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही लिलाव प्रक्रिया न्यायालयाच्या आदेशानुसार झाली आहे. न्यायालयाने ठरवून दिलेल्या मूल्यांकनापेक्षा अधिक किमतीमध्ये लिलाव पूर्ण झाले आहेत. डॉ. व्यंकट राठोड, उपविभागीय अधिकारी