निर्मला सीतारमण या अतिशय पावरफुल आहेत असं मला वाटलं होतं. आज देशाचा अंतरिम अर्थसंकल्प मांडताना त्या चांगल्या घोषणा करतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी जो अर्थसंकल्प सादर केला त्यानंतर असं वाटू लागलं आहे की त्यांच्या हाती काहीच नाही. त्यांच्यासमोर जो कागद येतो तो त्या वाचतात. त्या पलिकडे डोकं वापरण्याची मुभा त्यांना नाही अशा शब्दांमध्ये काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी निर्मला सीतारमण यांच्या बजेटवर टीका केली आहे.

यशोमती ठाकूर यांनी काय म्हटलं आहे?

आजचा अर्थसंकल्प मोघम स्वरूपाचा होता. लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून पाहिजे त्या घोषणा करण्यात आल्या. मात्र यात प्रत्यक्षात काहीच नाही. केवळ शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम या अर्थसंकल्पात केले आहे. शेतकऱ्यांना निव्वळ चुना लावण्याचं काम सरकारने केलं आहे. शिक्षक, विद्यार्थ्यांसाठी कुठलंही नियोजन झालेले नाही. त्याचप्रमाणे बेरोजगारांसाठी काही नियोजन झालेले नाहीये. पेट्रोल डिझेलचे वाढलेले भाव आहे तेवढेच आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही. कपाशीचे भाव आज एवढे खाली पडलेली आहे, एवढा कमी भाव याच्या आधी कधीच नव्हता. २००९ मध्ये १० ते ११ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता. मात्र आता अवघा चार हजारच्या खाली भावा देत आहे. हे बजेट अतिशय फेलिअर असं बजेट आहे. भविष्यासाठी इथं कुठलेही नियोजन झालेले नसल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी बोलताना दिली आहे.

आजच्या अर्थसंकल्पात अंगणवाडी ताईंसाठी काही नाही, विदर्भासाठी तर काहीच नाही. आज राज्यात आशाताई,आंगणवाडी सेविकांचा ज्वलंत प्रश्न आहे. त्यांच्यासाठी देखील फार काही या बजेट मध्ये नाही. एकंदरीत सर्वसामन्यांच्या, शेतकऱ्यांच्या दृष्टीने या बजेटमध्ये कुठलीही समाधानकारक बाब नसल्याचे देखील यशोमती ठाकूर म्हणाल्या.

हे पण वाचा- Budget 2024 Highlights : ”कर रचनेत कोणताही बदल नाही”, निर्मला सीतारमण म्हणाल्या…”जीएसटी संकलन…”

सबका साथ सबका विकास हेच आमचं लक्ष्य

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला १० वर्षांच्या कालावधीत मोदी सरकारने काय काय योजना आणल्या आणि कशी प्रगती साधली याची माहिती दिली. सबका साथ सबका विकास हा मंत्र घेऊन मोदी सरकार पुढे गेलं आहे. नव्या योजना, रोजगार निर्मिती यावर आम्ही भर दिला. ग्रामीण विकास, घर, पाणी, स्वयंपकाचा गॅस तसंच बँक खाती उघडण्यासाठी आम्ही वेगाने कार्य केलं. तसंच ८० कोटी लोकांना निशुल्क धान्य पुरवलं. ग्रामीण स्तरावर काम करणाऱ्या लोकांच्या उत्पन्नांमध्ये चांगली भर पडल्याचं दिसतं आहे असंही निर्मला सीतारमण यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०४७ पर्यंत देश विकसित राष्ट्र असेल

निर्मला सीतारमण म्हणाल्या, “आर्थिक सुधारणांवर भर देत आपला देश पुढे जातो आहे. २०४७ पर्यंत भारत देश हा विकसित राष्ट्र असेल यात काही शंकाच नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशासाठी काम करत असताना गरीब, महिला, अन्नदाता शेतकरी त्याची प्रगती साधणं ही प्राथमिकत आहे. मागच्या दहा वर्षांमध्ये २५ कोटी लोक हे दारिद्र्यरेषेच्या बाहेर आले आहेत. गरीब कल्याण हे देशाचं कल्याण हा मंत्र घेऊन पंतप्रधान मोदी वाटचाल करत आहेत. त्याचाच हा परिणाम आहे.”