यूपीएससीची तयारी : श्रीकांत जाधव
यूपीएससी मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर ३ मध्ये तंत्रज्ञान, आर्थिक विकास, जैवविविधता, पर्यावरण, सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन या घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच प्रत्येक घटकामध्ये अंतर्भूत असणाऱ्या मुद्यांची यादीही देण्यात आलेली आहे. प्रस्तुत लेखामध्ये या पेपरचे स्वरूप आणि व्याप्ती याचा थोडक्यात महत्त्वपूर्ण आढावा घेणार आहोत.
आर्थिक विकास – यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था संबंधित मुद्दय़ाचा समावेश करण्यात आलेला आहे. उदा. अर्थव्यवस्थेशी निगडित आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास, नसíगक साधनसंपत्ती व या संपत्तीच्या वापराचे नियोजन, सर्वसमावेशक वाढ साध्य करण्यासाठी सरकारमार्फत राबविले जाणारे महत्त्वाचे उपक्रम, देशातील बजेट प्रक्रिया ((Budgetary process) ) याचा समावेश होतो.
कृषी आणि कृषी संबंधित संलग्न असणारी क्षेत्रे तसेच कृषी क्षेत्राची उत्पादकता आणि स्थूल देशांतर्गत उत्पादनातील वाटा वाढविण्यासाठी सरकारमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना आणि या क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्या तसेच त्या समस्या सोडविण्यासाठी सरकारने आखलेली ध्येयधोरणे; औद्योगिक क्षेत्र, सेवाक्षेत्र यांसारख्या आर्थिक विकासाला आणि आर्थिक वृद्धीला अधिक गती देणाऱ्या क्षेत्रासाठी सरकारमार्फत राबविले जाणारे विविध उपक्रम, योजना आखण्यात आलेले कायदे, भारतामध्ये परकीय गुंतवणूक वाढविण्यासाठी आखण्यात आलेली रणनीती, याचबरोबर भारताचे परकीय व्यापार धोरण व निर्यात वाढीसाठी आखलेल्या विविध उपाययोजना, दळणवळण क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी सरकारमार्फत केले जाणारे विशेष प्रयत्न; १९९१ मध्ये भारताने अवलंबिलेले आर्थिक उदारीकरणाचे धोरण आणि याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम, जागतिकीकरणाचे भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेले परिणाम; उपरोक्त महत्त्वपूर्ण मुद्दय़ांचा अभ्यास या घटकाची तयारी करताना करावा लागतो.
तंत्रज्ञान – हा घटक मुखत्वे विज्ञान आणि तंत्रज्ञान या अनुषंगाने आहे. या घटकामध्ये भारत सरकारने विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये विकास घडवून आणण्यासाठी कोणत्या प्रकारच्या धोरणाची आखणी केलेली आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास व व्यवहार, उपयुक्तता तसेच याचा सर्वसामान्याच्या जीवनावर होणारे परिणाम, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये भारतीयाने केलेली कामगिरी आणि दिलेले योगदान तसेच माहिती तंत्रज्ञान, संगणक, अवकाश संशोधन, नॅनो तंत्रज्ञान, जैव-तंत्रज्ञान आणि बौद्धिक संपदा अधिकार संबंधित मुद्दे इत्यादी बाबींचा समावेश आहे. दररोज या संबंधित काहीना काही महत्त्वाच्या गोष्टी घडत असतात. त्यामुळे हा घटक अभ्यासताना उपरोक्तनमूद केलेल्या प्रत्येक बाबीची मूलभूत अर्थात संकल्पनासह योग्य समज असावी लागते.
थोडक्यात विज्ञान आणि तंत्रज्ञानचा घटक अभ्यासताना विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये लावले जाणारे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील नवनवीन शोध आणि या शोधामुळे होणारे फायदे-तोटे, संबंधित बौद्धिक संपदा अधिकार तसेच याचे होणारे परिणाम इत्यादी महत्त्वपूर्ण पलूवर भर देण्यात येतो.
जैवविविधता व पर्यावरण – या घटकामध्ये पर्यावरण संवर्धन, पर्यावरण आणि जैवविविधतेचा होणारा ऱ्हास आणि या ऱ्हासासाठी जबाबदार असणारे घटक, जैवविविधतेला निर्माण झालेला धोका, पर्यावरणीय प्रदूषण, नदी प्रदूषण, हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण व यामुळे उत्पन्न झालेल्या समस्या, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जैवविविधता आणि पर्यावरण संरक्षणासाठी केल्या जाणाऱ्या विविध उपाययोजना, भारत सरकारमार्फत जैवविविधता आणि पर्यावरण संरक्षित करण्यासाठी पारीत करण्यात आलेले विविध कायदे आणि त्यांची उपयुक्तता याच बरोबर पर्यावरणीय आघाताचे मूल्यमापन इत्यादी मुद्दे अभ्यासावे लागतात.
आपत्ती व्यवस्थापन – आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपत्तीचे प्रकार ज्यामध्ये नसíगक आणि मानवनिर्मित प्रकारांचा अंतर्भाव आहे, आपत्तीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या, तसेच आपत्ती निवारणासाठी सरकारमार्फत आखण्यात आलेली आपत्ती व्यवस्थापन योजना व कायदे इत्यादी मुद्दे अभ्यासावे लागणार आहेत.
सुरक्षा – सद्यस्थितीत भारताला बाह्य आणि अंतर्गत सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्या देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देत आहेत. सुरक्षा या घटकामध्ये भारताच्या बाह्य आणि अंतर्गत सुरक्षासंबंधी मुद्दय़ांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये नक्षलवाद, सीमेपलीकडून होणारी घुसखोरी, दहशतवाद, वाढता प्रादेशिकवाद, पूर्वेकडील राज्यामध्ये होणारी घुसखोरी व वांशिक चळवळी, जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद, आंतरराष्ट्रीय सीमासंबंधी असणारे वादविवाद, संघटित गुन्हेगारी, अवैध पसा हस्तांतरण, सीमेवर अवैधरित्या होणारी नशिल्या पदार्थाची तस्करी आणि त्याचे संघटित स्वरूप, सततचे भाषिक वाद, राज्याराज्यांतर्गत असणारे वाद, धार्मिक दंगे, सायबर सुरक्षा संबंधित मूलभूत माहिती, माध्यमे आणि समाजमाध्यमे यांचा होणारा वापर ज्याद्वारे देशातील सामाजिक सलोख्याला निर्माण होणारा धोका, सुरक्षिततेला निर्माण होणारी आव्हाने इत्यादी बाबी आणि याच्या जोडीला या आव्हानांना सामोरे जाताना भारत सरकारने आखलेली रणनीती ज्यामध्ये सीमा सुरक्षा आणि व्यवस्थापन अधिक सक्षमरीत्या राबविणे, सीमेलगतच्या भागाचा विकास घडवून आणणे, याचबरोबर सागरी सुरक्षा अबाधित राखणे इत्यादी महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे.
देशाची बाह्य आणि अंतर्गतसुरक्षा अबाधित राखण्यासाठी सरकारमार्फत स्थापन करण्यात आलेल्या विविध सरकारी संस्था आणि संघटना आणि त्यांना नेमून दिलेले कार्य याचबरोबर सरकारमार्फत वेळोवेळी केल्या जाणाऱ्या उपाययोजना व कायदे याची माहिती असणे आवश्यक आहे.
उपरोक्त चर्चिलेल्या जवळपास सर्व घटकांमध्ये महत्त्वाच्या संकल्पनांचाही समावेश असतो. या संकल्पनांचे योग्य आकलन करणे अपेक्षित आहे ज्यामुळे विषयावर प्रभुत्व निर्माण करणे सोपे होते. आपण या पुढील प्रत्येक लेखामध्ये संबंधित घटकामधील काही महत्त्वाच्या संकल्पनांवरही चर्चा करणार आहोत. उपरोक्त चíचलेले सर्व घटक अभ्यासताना या घटकासंबंधित घडणाऱ्या महत्त्वाच्या चालू घडामोडींचीही तयारी करावी लागणार आहे. अर्थात प्रत्येक घटकाचे मूलभूत ज्ञान असल्याशिवाय चालू घडामोडीचे योग्य आकलन करता येत नाही. या पुढील लेखामध्ये या पेपरमध्ये नमूद केलेल्या आर्थिक विकास या घटकाची तयारी करण्यासाठी लागणाऱ्या उपयुक्त संदर्भ ग्रंथाचा तसेच गतवर्षीय मुख्य परीक्षेत या घटकावर कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात आलेले होते याची एकत्रितपणे चर्चा करणार आहोत.