स्वाती दामोदरे
कल्पना करा की तुम्ही एखाद्या निसर्ग चित्रापुढे बसला आहात, हे चित्र तीन बाय चार किंवा चार बाय पाच नसून चांगलंच प्रचंड आहे! इतकं की, या चित्रातून तुम्हाला चालत जाता येईल, त्यातले तपशील जवळून बघता येतील! मी अशाच एका चित्रासमोर बुद्ध पौर्णिमेची सबंध रात्र बसून राहिलेले होते…

माझ्या समोरच्या चित्रात मध्यभागी गोलाकृती तळं होतं. तळ्याच्या आजूबाजूला दोन-चार वृक्ष, ज्यांच्या खाली वाकलेल्या फांद्यांच्या प्रतिबिंबामुळं तळ्यातले स्थिर पाणी आणखीनच मोहक-सुंदर दिसत होतं! तळ्याच्या दुसऱ्या काठावर बऱ्यापैकी घनदाट जंगल, एकीकडे गवताळ कुरणासारखा पसरलेला उतार होता. समोर डावीउजवीकडून तळ्याकडे येणाऱ्या पायवाटा होत्या! मंत्रमुग्ध होऊन मी या भव्य चित्राकडे कित्येक तास बघत होते. सुरुवातीला चित्र थोडं अंधारं-अस्पष्ट होतं कारण माझ्या मी बसलेल्या त्या जंगलातल्या मचाणाच्या पाठीमागच्या बाजूला चंद्र होता. बुद्धपौर्णिमेचा चंद्र माथ्यावर येत गेला तसतसं माझ्यासमोरचं चित्र चंद्रप्रकाशात न्हाऊन निघालं. आपल्या स्मार्ट फोनमध्ये आपण एडिट पिक्चरमध्ये जाऊन ब्राइटनेस वाढवतो नं? बस्स तसंच! आता माझ्या पुढ्यातल्या चित्राची स्पष्टता फारच वाढली, माझा त्यातला रसही वाढला! चित्रातला साऊंड इफेक्ट तेव्हा जाणवायला लागला जेव्हा रानात पसरलेल्या वाळलेल्या पानांवरून कोणी चालत जाऊ-येऊ लागलं. ज्यांच्या पावलांचे आवाज होते, ती रानडुकरं किंवा नीलगाई चंद्रप्रकाशात चित्रात दिसायच्या, नि दुसऱ्या कोपऱ्याकडून चित्राच्या बाहेर निघून जायच्या. वाळलेल्या पानांवरचे दबके आवाज ऐकताना रोखलेला माझा श्वास आणि छातीत वाढलेली धडधड हळूहळू शांत होत जायची. कधी घुबडांचे आवाज, कधी नाइटजार पक्ष्याचे (बहुधा रातवा) आवाज, कधी दुरून एखाद्या चितळ, सांबर, हरणानं घातलेली साद यामुळे माझं चित्र सतत जिवंत होतं. चित्र न्याहाळण्याचा कंटाळा येण्याची तर बातच नव्हती!

अशात रात्री बारा वाजून एक मिनिटांनी चित्रातल्या उजवीकडल्या पायवाटेवरून एक आकृती पावलांचा अजिबात आवाज न करता तळ्यावर आली. स्वच्छ चंद्रप्रकाशातली तकतकीत कांती आणि त्यावर उठून दिसणारे ठिपके! त्या हिंस्रा, पण मोहक आकृतीला मी लगेच ओळखलं …बिबट्या! या बिबट्यानं येताना कुठल्याही वाळलेल्या पानावर पाय पडू दिला नव्हता! चित्रात नांदत असलेल्या शांततेवर जराही ओरखडा उमटू दिला नव्हता. मी त्या अप्रतिम दृश्याला नुसतं डोळ्यांनी पीत राहिले. साधारण मिनिटभरानंतर डावीकडल्या पायवाटेवरून ते देखणं जनावर शांतपणे चालत माझ्या चित्राच्या चौकटीबाहेर निघून गेलं. मी ते दृश्य स्मृतीमध्ये साठवत पुढची पंधरा-वीस मिनिटं घालवली आणि तळ्यापलीकडच्या जंगलातून पुन्हा मला एक अस्पष्ट आकृती समोर येताना दिसू लागली. हे हरीण होतं का? नाही. नीलगाय? नाही! मग हे नेमकं आहे तरी काय? डोळे ताणून बघण्याचा प्रयत्न केला आणि आश्चर्याचा धक्काच बसला. अंगभर लांब काटे फुललेलं पूर्ण वाढीचं साळिंदर होतं ते! पाणवठ्यावर येऊन, पाणी पिऊन ते आल्या वाटेनं माझ्या चित्राबाहेर निघून गेलं. माझ्या चित्रामध्ये अशाच काही आकृती – काही आवाज येत-जात राहिले, रात्र पुढे सरकत राहिली. पहाटे पाचपासून माझ्या चित्राचा ब्राइटनेस वाढायला लागला.

साडेसहाला चित्राचा ब्राइटनेस फुल्ल होता. त्यावेळी माझ्या सोबत असलेल्या वन विभागाच्या सुरक्षारक्षिकेला विचारून, मचाणावरून खाली उतरून मी चालत तळ्यापर्यंत गेले. डावीकडे जावं की उजवीकडे हे न कळून मी क्षणभर त्या तळ्याकाठी स्तब्ध उभी राहिले. त्या क्षणभरात मी आजूबाजूच्या वृक्ष, माती, पाणी, झाड, पक्षी, वाटा या वातावरणाचा हिस्सा झालेली होते. निश्चल होते! स्तब्ध होते! नि:शब्द होते! त्याक्षणी मला प्रकर्षानं जाणवलं की, रात्रभर जे चित्र माझ्या डोळ्यासमोर आहे, त्या चित्राचा याक्षणी मी स्वत:च एक भाग झालेली आहे. हे सगळं माझं आहे? मीही या सगळ्यांचा हिस्सा आहे? हे वाटणं प्रचंड आनंददायक होतं. रानाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोनच बदलणारं होतं. आजूबाजूला पाखरांचे आवाज होते. जंगलाचा दरवळ वाहणारी गार मंद हवा होती. काही क्षणांनी भानावर येत मी आजूबाजूला नजर टाकली. रात्री येऊन गेलेल्या बिबट्याचे पंजे तळ्याकाठच्या मऊ मातीत स्वच्छ स्पष्ट उमटले होते. निदान ही एक गोष्ट नक्कीच अशी होती जिची मी एकमेव साक्षीदार होते. त्या पावलांचा मागोवा घेत थोडी पायवाट चालून आले.

फिरता फिरता उन्हं वर यायला लागली, पक्ष्यांचे आवाज जास्तच सुरू झाले. आपण या सगळ्या पर्यावरणाचा हिस्सा कसा आहोत? साक्षीभावनेनं या सगळ्याकडे कसं बघायचं? ते आतून उमजून आलं. हा ठेवा असाच राहायला हवा. पुढच्या पिढीला हस्तांतरित व्हायला हवा, याचं पुरेपूर भान आलं! सहअस्तित्व म्हणजे काय हे त्या चित्रफ्रेममधून फिरून येत मी समजून घेतलं. कितीही आवडत असलं तरी शेवटी हे जंगल आहे, मी एकटी आहे आणि मचाण सोडून फार दूर भटकणं योग्य नाही, याची जाणीव होताच मागे वळाले. शिडीच्या पायऱ्या चढून परत मचाणावर येऊन बसले. फुल्ल ब्राइटनेस नि साऊंड इफेक्टस वाढलेल्या माझ्या चित्रावर आता मी पुन्हा माझे डोळे खिळवले! एका नव्या जाणिवेसह, मी आता माझ्या चित्रातून बाहेर आले होते की आपण सर्व या चित्राचा अविभाज्य हिस्सा आहोत…?

दर वर्षी बुद्धपौर्णिमेच्या वा वैशाख पौर्णिमेच्या रात्री प्रकाशात निथळून निघणारे जंगल बघणं हा एक अत्यंत आवडीचा-जिव्हाळ्याचा विषय. तो चुकवावासा वाटत नाही. म्हणून मी ऑनलाइन बुकिंगच्या खटपटींपासून बाकीच्या अनेक खटपटी करते आणि वन विभागाच्या वन्य प्राणीगणना कार्यक्रमात सहभागी होऊन आणखी एक अनुभव गाठीशी बांधण्याचा प्रयत्न करतेच; यंदाही झाले.

सुरुवातीलाच हे नमूद करते की, मी शास्त्रशुद्ध अभ्यास करणारी पक्षी-पशुतज्ज्ञ, प्राणीशास्त्राची अभ्यासक यापैकी कोणीही नाही. अभ्यास, संवर्धन संगोपन करणाऱ्या कुठल्याही कार्यक्रमाचा मी हिस्सा नाही. ‘मला आवडतं’ या पलीकडे सांगण्यासारखं माझ्याजवळ काहीही नाही. मात्र गेली ५ वर्षं वारंवार या कार्यक्रमाला जाऊन काही निरीक्षणांची शिदोरी नक्कीच जमा झाली आहे. तीच वाचकांसाठी…

महाराष्ट्र शासनाच्या या पशु-प्राणी गणना कार्यक्रमात कोणाही जंगलप्रेमी व्यक्तीला सहभागी होता येतं. हा उपक्रम दर वर्षी बुद्ध पौर्णिमेच्या रात्री आयोजित केला जातो याचं कारण बुद्ध पौर्णिमेला रात्री प्रकाशमान पूर्ण चंद्र असल्यामुळे घनदाट जंगलातसुद्धा बऱ्यापैकी स्वच्छ दिसू शकतं. आपला वन विभाग म्हणजेच फॉरेस्ट खाते सर्वसामान्य लोकांना या कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता प्रोत्साहित करीत असते. आता वन विभागाच्या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करता येते. आम्ही मेळघाट परिक्षेत्रात या उपक्रमात सहभागी होत असल्यामुळे www. magicalmelghat. in वर जाऊन सशुल्क स्वत:ची नोंदणी करतो. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी सकाळी साधारण दहा वाजल्यापासून त्या त्या जंगल परिक्षेत्राच्या कार्यालयांमधून संपर्क साधला जातो. काही मार्गदर्शक सूचना देऊन वन विभागाच्या गाड्यांनी मचाणावर सोडले जाते. कृत्रिम पाणवठे किंवा तळी स्पष्ट दिसतील अशा जवळपासच्या भागात मचाणे उभारलेली असतात. संध्याकाळी चारनंतर जंगल निवांत असते. संध्याकाळपासून दुसऱ्या दिवशी अंदाजे सकाळी साडेसात वाजेपर्यंत प्रत्येक मचाणावर एक सहभागी नागरिक आणि एक फॉरेस्ट गार्ड बसतात. रात्रभर पौर्णिमेच्या प्रकाशात जंगल निरीक्षण करून पाणवठ्यावर येणाऱ्या प्राण्यांच्या नोंदी (नर, मादी, बच्चे संख्या) करून सकाळी वन विभागाची गाडी घ्यायला आल्यावर लोक परत वन विभागाच्या कार्यालयात पोहोचतात. मी मागील पाच ते सहा वर्षे सलग या कार्यक्रमात सातत्याने सहभागी होऊन या कार्यक्रमासाठी माझा हातभार लावत आहे.

हा रात्रीच्या जंगलाचा अनुभवच विलक्षण असतो. त्या रात्रीही, मी रात्री मचाणावर असताना पहाटे साडेतीनच्या सुमाराला स्वच्छ दुधाळ चंद्रप्रकाशात दूरवर पसरलेल्या जंगलात जी मोठाल्या वृक्षांच्या पानांची सळसळ, त्यांच्या फांद्यांचे हेलकावे, त्याचा सामूहिक आवाज आणि हवेत पसरलेला प्रसन्न गारवा निर्माण झाला होता, तसला एकत्रित परिणाम माझ्या अनुभवाप्रमाणे कुठल्याही एसी कूलर, होम थिएटर, मल्टिप्लेक्स, अॅडव्हान्स साऊंड, डॉल्बी सिस्टिम, अत्याधुनिक हेडफोन कशानेच निर्माण करता येणार नाही. खरं तर तो नीट शब्दांत सांगताही येणार नाही. तो अनुभवण्याचाच विषय आहे. त्यासाठी जंगलात, जंगलाचाच भाग बनून आपलं अस्तित्व विसरून (की विरघळून?) शांत बसून राहता यायला हवं. अर्थात ते इतकं सोपं नाही, पण प्रयत्न करण्यासारखं नक्कीच आहे. जंगल इतकं आदिम, इतकं अफाट आणि इतकं स्वयंपूर्ण आहे की त्याला निरखताना केवळ नतमस्तक होता येतं. आपण जंगलाला काहीच देणार नसतो, देऊ शकत नसतो.

जंगल सफारी म्हणजे व्याघ्रदर्शन हे समीकरण चुकीचे आहे, असं मला वाटतं. जंगल दर्शन किंवा जंगल अनुभवणं हा खरा उद्देश असू शकतो. कधी कधी सफारी दरम्यान अस्वल किंवा वाघाचे दर्शन होते आणि पर्यटकांच्या उत्साहाला उधाण येते. ही गोष्ट अस्वाभाविक तर नाही; पण प्राण्यांच्या अधिकाधिक जवळ न्या, असा आग्रह गाइड किंवा ड्रायव्हरला करणं, त्यांनी ऐकावं म्हणून त्यांना पैशांचं आमिष दाखवणं, जास्तीत जास्त जवळून वन्य प्राण्यांचे फोटो काढण्याचा प्रयत्न करणं हे तर अत्यंत चुकीचं ठरतं. अशा घटनांमध्ये प्रचंड वाढ होत असल्याचे दिसते आहे. सफारीचे किंवा जंगल दर्शनाचे पैसे भरले म्हणजे आपल्याच ताब्यात इथल्या सर्व गोष्टी आहेत असे मानून नियम धुडकावून वागणे याला जंगल प्रेम नक्कीच म्हणता येणार नाही.

यापूर्वीसुद्धा अनेक वेळा व्याघ्रदर्शनाचे फोटो, व्हिडीओ समाज माध्यमांमधून प्रसिद्ध केले गेले आहेतच. पण ते करणाऱ्या अनेक व्यक्तींना अनावधानाने त्यांच्याकडून चुकीच्या ठिकाणी महत्त्वाची माहिती पोहोचल्याचे लक्षात येत नाही किंवा त्यांच्यामुळे प्राण्यांना आणि जंगलाला उपद्रव निर्माण झाला हेही लक्षात येत नाही. तज्ज्ञ अभ्यासकांच्या मते, अशा फोटो, व्हिडीओ चर्चांमधून कुठल्या जंगलात कुठले प्राणी किती संख्येने कुठे आहेत याची माहिती सहजासहजी शिकारी, सापळे लावणारे लोक, तस्करी करणारे लोक यांच्यापर्यंत पोहोचू शकते आणि त्यांना आपला कार्यभाग साधणं आणखीन सोपं होऊ शकतं. पर्यटकांचा किंवा फोटो काढून शेअर करणाऱ्यांचा उद्देश वाईट नसेलही; पण जर परिणाम वाईट असतील तर ते त्यांना कोणीतरी लक्षात आणून द्यायला हवं आणि त्यांनी या कार्यक्रमाला पूर्णविराम द्यायला हवा.

माझ्या दृष्टीने जंगल ही सर्वथा अद्भुत गोष्ट आहे, जिचे माणसाच्या हस्तक्षेपावाचून काहीही अडलेले नाही. या जंगलाच्या पोटात असलेल्या अनेक गूढ हालचालींचा, गोष्टींचा, गुपितांचा शोध घेण्याचा मोह माणसाला युगायुगांपासून होत आला आहे. एकीकडे जेवढे जंगल आकर्षक वाटते तेवढेच भीतीदायकसुद्धा वाटते! त्यातही दाट जंगलात एकटंदुकटं आणि तेही रात्रीच्या अंधाराच्या वेळी असणं याची कल्पना सर्वसामान्य माणसाला करवत नाही. पण जंगल प्राणी पशु-पक्षी यांच्या हालचालींना बाधा न आणता; योग्य सुरक्षा व्यवस्थेच्या मदतीने, केवळ निरीक्षणाकरता रात्रभर एखाद्या जंगलाच्या काळजात राहता आले तर? आणि हीच अद्भुत संधी बुद्ध पौर्णिमेच्या प्राणी गणनेच्या निमित्ताने मिळते. या कार्यक्रमाचा उद्देश वन विभागाला सर्वसामान्य जनतेशी जोडण्याचा, जाणीव जागृती वाढवण्याचा आहे. सर्वसामान्यांना खोल जंगलात मध्यरात्री एकटं (रेंज नसल्यामुळे मोबाइलशिवाय) बसून तो परिसर, ती पानांची सळसळ, शांत अंधारात निथळत असलेलं पौर्णिमेचं चांदणं आणि या पार्श्वभूमीवर जंगली श्वापदांच्या पावलांची चाहूल, नि:श्वास, हुंकार, गुरगुर, डरकाळी, पाणी पिताना होणारा जिभेचा आवाज, पंखांचा अंधारातला फडफडाट, हे सर्व काही अनुभवण्यासाठी दिलेली एक संधी असते. तुमच्या अस्तित्वाची दखलसुद्धा न घेता आपल्या लयीत जगणारे जंगल, तिथले प्राणी पशुपक्षी वेली वृक्ष यांना जवळून निरखण्याची, जाणून घेण्याची, आपल्या ज्ञानात भर घालण्याची ती संधी आहे. अशी संधी हातात आलेली असताना फ्लॅश वापरून फोटो काढणं, आपसात किंवा फोनवर जोरजोरात बोलणं, मोबाइलवर गाणी लावणं आणि जंगलाच्या शांततेवर ओरखडे उमटवणं असे उपद्रव लोकांनी का करावेत?

खरोखरच जंगलाला कोणाच्या मदतीची गरजसुद्धा नसते. फक्त आपण ती सगळी व्यवस्था उगाचच बिघडवू नये, आपल्या आनंदासाठी तिथून काहीही हिसकण्याची वृत्ती घेऊन तिथे शिरकाव करू नये एवढे मला नक्की सांगावेसे वाटते. त्यापेक्षा एखाद्या बुद्ध पौर्णिमेच्या रात्री, नि:शब्द शांततेतला जंगलाचा दरवळ तनामनात भरून घ्यावा आणि तो अनुभव आत आत खोलवर रुजू द्यावा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

swatidamodare07@gmail.com