पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेस अध्यक्षा ममता बॅनर्जी यांना विधानसभा निवडणुकी अगोदर आणखी एक धक्का बसला आहे. कारण, टीएमसीचा आणखी एक आमदार भाजपाच्या गळाला लागला आहे. शांतीपूरचे आमदार अरिंदम भट्टाचार्य यांनी पक्ष सोडून, भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

प्राप्त माहितीनुसार, भट्टाचार्य पश्चिम बंगालचे भाजपा प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत भाजपात प्रवेश करणार आहेत. भट्टाचार्य यांनी काँग्रेसच्या तिकीटावर २०१६ मध्ये निवडणूक जिंकली होती व त्याच्या पुढील वर्षीच त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता ते भाजपात प्रवेश करणार आहेत.

या अगोदर ममता बॅनर्जींना सोडून टीएमसीच्या अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केलेल आहे. तर, मागील महिन्यातच ममता बॅनर्जी यांच्या सरकारमधील शुभेंदु अधिकारी यांनी देखील सहा ते सात टीएमसीच्या नेत्यांसह भाजपात प्रवेश केलेला आहे. त्यामुळे आता ममता बॅनर्जींसमोर पक्षाची गळती थांबवण्याचे मोठे आव्हान निर्माण झालेले आहे.