१४ एप्रिलपासून ३ हजार किलो कचरा उचलला

माउंट एव्हरेस्टवर १४ एप्रिलपासून स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली असून त्यात आतापर्यंत ३ हजार किलो कचरा गोळा करण्यात आला आहे. एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर मानले जाते. एव्हरेस्ट स्वच्छता मोहीम ४५ दिवस राबवली जाणार असून सोलुखुम्बू जिल्ह्य़ातील खुंबू पासनगलामू ग्रामीण पालिकेने ही मोहीम १४ एप्रिलला सुरू केली. या दिवशी नेपाळी नववर्ष सुरू होते त्यात १० हजार किलो कचरा एव्हरेस्टवरून गोळा करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. पर्यटन महासंचालक दांडू राज घिमिरे यांनी सांगितले की, आतापर्यंत तीन हजार किलो कचरा गोळा करण्यात आला असून त्यातील दोन हजार किलो कचरा ओखालधुंगा येथे, तर १००० किलो कचरा काठमांडूला पाठवण्यात आला आहे. कचरा पाठवण्यासाठी लष्कराच्या हेलिकॉप्टर्सचा वापर करण्यात आला. बेसकॅम्पवरून पाच हजार किलो. दक्षिण भागातून २००० किलो तर कॅम्प २ व ३ भागातून ३ हजार किलो कचरा गोळा करण्याचा संकल्प आहे. एव्हरेस्टवर पडलेले मृतदेहही परत आणण्याचा समावेश या मोहिमेत आहे. या मोहिमेत सर्व लोक सहभागी आहेत. बेसकॅम्पच्या ठिकाणी चार मृतदेह सापडले असून ते खाली आणण्यात आले आहेत. एव्हरेस्ट स्वच्छता मोहिमेत २३ दशलक्ष नेपाळी रुपये खर्च होणार आहेत. या मोसमात ५०० परदेशी गिर्यारोहक व १००० सहायक मोहिमात सहभागी होणार आहेत. गिर्यारोहकांनी त्यांचा कचरा परत आणला तर ते जास्त फायदेशीर ठरेल  असे सांगण्यात आले. २९ मे १९५३ रोजी एडंमड हिलरी व तेनसिंग नोर्गे यांनी पहिल्यांदा एव्हरेस्ट सर केले होते. त्यामुळे ही मोहीम त्यादिवशी संपणार आहे.