भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. केंद्र सरकार करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अयशस्वी ठरल्याचा आरोप राहुल यांनी केला होता. यावरुनच रविशंकर यांनी राहुल यांच्यावर टीकास्त्र सोडताना राहुल गांधी हे खोटं बोलत असल्याचा आरोप केला आहे. “जेव्हापासून करोनाची दुर्देवी परिस्थिती देशावर ओढावली आहे तेव्हापासून राहुल गांधी या लढाईमध्ये देशातील नागरिकांचा संकल्प तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. ते सरळ सरळ खोटं बोलत आहेत आणि चुकीची वक्तव्ये करत आहेत. आकडे आणि माहितीमध्ये फेरफार करुन ते लोकांसमोर मांडत आहेत,” असं रविशंकर म्हणाले आहेत.

“राहुल गांधी काहीही विचार न करता बोलतात. त्यांनी विषयाचा नीट अभ्यास केलेला नसतो. स्थलांतरित मजुरांच्या मुद्द्यावर ते केवळ राजकारण करत आहेत. काँग्रेसची सत्ता असणाऱ्या राज्यांमधील सरकारेही राहुल गांधीचं ऐकत नाही. सोनिया गांधी यांनी भिलवाडा करोनामुक्तीच्या मॉडेलचे श्रेय राहुल गांधींना दिलं होतं. मात्र तेथील सरपंचांनीच हे सर्व लोकांच्या सहकार्यामुळे शक्य झाल्याचं नंतर स्पष्ट केलं होतं. करोनाच्या लढाईमध्ये वायनाडला (राहुल गांधींचा मतदारसंघ) मोठे यश मिळाल्याचा दावा त्यांनी आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने केला होता. मात्र सत्य परिस्थिती ही आहे की वायनाड केरळमधील करोना हॉटस्पॉट झाला होता,” असा टोला रविशंकर यांनी राहुल यांच्यावर टीका करताना लगावला आहे.

आणखी वाचा- महाराष्ट्रात सरकारला पाठिंबा, पण मोठे निर्णय घेण्याचा अधिकार नाही – राहुल गांधी

“महाराष्ट्र सरकारच्या अपयशापासून राहुल गांधी दूर पळत आहेत. महाराष्ट्रासंदर्भातील निर्णयांमध्ये आम्ही सहभागी नाही असं ते सांगतात. याचाच अर्थ ते महाराष्ट्र सरकारच्या अपयशापासून स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी आम्हाला सल्ला देण्यापेक्षा आधी स्वत:ची सत्ता असणाऱ्या राज्यांमधील काम पहावे,” असा सल्ला रविशंकर यांनी राहुल यांना दिला आहे.

आणखी वाचा- महाराष्ट्र सरकार प्रवासी आणण्यात असमर्थ, ८५ ऐवजी २७ ट्रेनच सुटल्या – पीयूष गोयल

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिवे लावण्यासंदर्भात केलेल्या आवाहनाचीही राहुल यांनी खिल्ली उडवली होती अशी आठवणही रविशंकर प्रसाद यांनी करुन दिली. “पंतप्रधानांनी दिवा लावण्याचे आवाहन केलं होतं तेव्हा त्याचीही राहुल यांनी खिल्ली उडवली होती. देशाची एकात्मता तोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तसेच मजुरांबद्दल ट्विट करुन नाटकही त्यांनी केलं,” असं रविशंकर प्रसाद राहुल यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले.