महाराष्ट्रात एकत्र निवडणूक लढवल्यानंतरही शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युल्यावर अडून राहिल्याने भाजपाचे सत्तेचे स्वप्न भंगले होते. याची बिहारमध्ये पुनरावृत्ती होऊ नये म्हणून भाजपाने विशेष काळजी घेतली आहे. त्यामुळेच बिहारमध्ये ‘जर-तर’चा प्रश्न असणार नाही. जदयूपेक्षा भाजपाच्या जास्त जागा आल्या तरी मुख्यमंत्री नितीशकुमारच होणार अशी जाहीर घोषणाच गृहमंत्री अमित शाह यांनी सीएनएन-न्यूज १८शी बोलताना केली.

शाह म्हणाले, “राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) बिहार विधानसभा निवडणुकीत दोन-तृतीयांश बहुमत मिळेल. मुख्यमंत्रीपदासाठी या ठिकाणी ‘जर-तर’ असणार नाही. बिहारमध्ये नितीशकुमार हेच पुढील मुख्यमंत्री असतील, याची आम्ही सार्वजनिकरित्या घोषणा केली आहे आणि आम्ही याला बांधील आहोत. जरी भाजपाने जदयूपेक्षा जास्ता जागा मिळवल्या तरीही.”

“बिहारच्या लोकांना डबल इंजिनचे सरकार मिळणार आहे. एक राज्यात नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली तर दुसरे केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली.” लोकजनशक्ती पार्टीच्या एनडीएतून बाहेर पडण्याच्या निर्णयावर शाह म्हणाले, “लोजपाला आम्ही पुरेशा जागा दिल्या होत्या मात्र तरी देखील ते बाहेर पडले. हा त्यांचा निर्णय आहे आमचा नाही.”

कोणत्याही भ्रमात राहू नका; भाजपाचा चिराग पासवान यांना सल्ला

लोजपाचे प्रमुख चिराग पासवान यांनी शुक्रवारी जदयूवर टीका करताना जदयूला मतदान करणे म्हणजे राज्याला मागे घेऊन जाणे ठरेल, असं विधान केलं होतं. ट्विटरवरुन त्यांनी लोजपाच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. तसेच जर लोजपा सत्तेत आली तर ‘प्रथम बिहार, प्रथम बिहारी’ हे व्हिजन डॉक्युमेंटचा अवलंब करु अशी घोषणा केली. अमित शाह यांचे कौतुक करताना चिराग यांनी त्यांना पंतप्रधान मोदींचे हनुमान असं संबोधलं होतं. मात्र, यावरुन भाजपाने त्यांना कुठल्याही भ्रमात न राहण्याचा सल्ला दिला आहे.