आपल्या देशातल्या जनतेवर आता महागाईची कुऱ्हाड कोसळली आहे. महागाई ही सहन करण्याच्या पलिकडे गेली आहे. शेतकऱ्यांसाठी काळे कायदे आणले गेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. या कायद्यांमुळे शेतकऱ्यांवर लाचार होण्याची वेळ आली आहे. एवढं सगळं देशात घडत असतानाही फक्त निवडक मित्रांचा फायदा करुन देत मोदी सरकार गप्प बसलं आहे या आशयाचं ट्विट करत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

चार दिवसांपूर्वीच भारत जागतिक कुपोषण निर्देशांकात भारत ९४ व्या स्थानी पोहचला आहे. यासंबंधीचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला त्यावरुनही राहुल गांधी यांनी मोदींवर टीका केली होती. या सरकारने आपल्या खास मित्रांचे खिसे भरण्याचं काम केलं आहे असं राहुल गांधींनी म्हटलं होतं. आता पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर महागाई आणि कृषी कायद्यांवरुन टीका केली आहे. देशात महागाई प्रचंड वाढलेली आहे. भारतातील गरीब भुकेला आहे अशात मोदी सरकारने फक्त आपल्या काही मित्रांचं भलं केलं आहे असंही राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा म्हटलं आहे.

कृषी कायद्यांना तर काँग्रेसने कडाडून विरोध दर्शवलेलाच आहे. त्यासाठी आंदोलनंही झाली होती. तसंच काँग्रेसशासित राज्यांमध्ये हे कायदे लागू करु नयेत अशीही भूमिका काँग्रेसने जाहीर केली. या कायद्यांमुळे शेतकऱ्याचं कंबरडं मोडणार आहे. देशातला शेतकरी आधीच अनेक संकटांना सामोरा जात असतो अशात केंद्र सरकारने हे काळे कायदे आणून शेतकऱ्यांवर अन्याय केल्याचं काँग्रेसने म्हटलं होतं. आज राहुल गांधी यांनी कृषी कायदे आणि वाढती महागाई यांचा संदर्भ घेऊन पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका केली आहे.