काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा केंद्रीय अर्थसंकल्पावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. हा अर्थसंकल्प शेतकरी व जवानांच्या हिताचा नसून, केवळ उद्योजकांच्या फायद्याचा असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे. अर्थसंकल्पात सैनिकांच्या पेंशन कपातीच्या मुद्य्यावरून राहुल गांधींनी ट्विटद्वारे केंद्र सरकारवर टीका केली आहे.

“अर्थसंकल्पात सैनिकांच्या पेंशनमध्ये कपात. जवानही नाही, शेतकरीही नाही मोदी सरकारसाठी तीन-चार उद्योजक मित्रच देव आहेत.” अशा शब्दांमध्ये ट्विट करत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

तसेच, “चीनने आपला भूभाग बळकावला आहे. पीआर फोटोसाठी म्हणून पंतप्रधान मोदी जवानांसोबत दिवाळी साजरी करतात. मग त्यांनी सैनिकांसाठी संरक्षणाचे बजेट का वाढवले नाही?” असा सवाल या अगोदर राहुल गांधी यांनी टि्वटद्वारे मोदी सरकारला विचारलेला आहे.

“पीआर फोटोंसाठी सैनिकांबरोबर दिवाळी साजरी करता मग…” राहुल गांधींचा मोदींना महत्त्वाचा सवाल

“केंद्रीय बजेटच्या महागाईमुळे घरगुती एलपीजी सिलेंडर आणि पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. मोदी सरकारने देशाचं आणि घराचं दोन्हींचं बजेट बिघडवलं आहे” असं देखील राहुल गांधी केंद्रीय अर्थसंकल्पावरून केंद्र सरकारवर टीका करताना या अगोदर म्हणाले आहेत.