रिझर्व्ह बँकेने सोमवारी जाहीर केलेल्या निर्णयानुसार आता एटीएम मशिन्समधून पैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार एटीएम मशिनमधून दिवसाला दहा हजार रूपयांची रक्कम काढता येईल. यापूर्वी ही मर्यादा ४५०० इतकी होती. मात्र, एटीएम मशिनमधून आठवड्याला २४ हजार रूपये काढण्याची मर्यादा कायम ठेवण्यात आली आहे. याशिवाय, बँकेच्या चालू खात्यातून रक्कम काढण्याच्या मर्यादेतही वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी ही मर्यादा ५० हजार इतकी होती, ती आता एक लाख इतकी करण्यात आली आहे.
#FLASH ATM withdrawal limits enhanced from current limit of Rs 4500 to Rs 10,000 per day, per card.
— ANI (@ANI) January 16, 2017
#FLASH: Limit on withdrawal from current accounts has been enhanced from current limit of Rs 50,000 per week to Rs 1 lakh per week.
— ANI (@ANI) January 16, 2017
नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर देशात अभूतपूर्व अशी चलनटंचाई निर्माण झाली होती. दोन हजारांच्या नव्या नोटांच्या आकारामुळे देशभरातील देशभरातील सर्व एटीएम मशिन्सच्या रिकॅलिब्रेशनचे काम हाती घ्यावी लागले होते. त्यामुळे दरम्यानच्या काळात लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आता परिस्थिती काहीप्रमाणात सुधारली असली तरी एटीएम मशिन्समधून आठवड्याला काढण्यात येणाऱ्या रकमेवरील निर्बंध अद्यापही कायम आहेत. याशिवाय, अनेक एटीएम मशिन्सच्या रिकॅलिब्रेशनचे काम अजूनही बाकी आहे. मात्र, आता रिझर्व्ह बँकेकडून दिवसाला काढण्यात येणाऱ्या रकमेवरील निर्बंध काहीप्रमाणात शिथिल करण्यात आल्याने लोकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, भविष्यकाळात एटीएममधून केले जाणारे मोफत व्यवहार निम्म्याने कमी करण्याचा प्रस्ताव सरकारकडे विचाराधीन आहे. सध्या एका एटीएम कार्डच्या मदतीने तुम्हाला दर महिन्याला ८ ते १० व्यवहार मोफत करता येतात. मात्र या मोफत व्यवहारांची संख्या फक्त तीनवर आणण्याचा सरकारचा विचार आहे. याबद्दलचे वृत्त ‘इकॉनॉमिक टाईम्स’ने दिले आहे.
अर्थसंकल्प मांडण्याआधी अर्थ मंत्रालयाकडून विविध क्षेत्रांकडून सूचना मागवल्या जातात. यामध्ये बँकिंग क्षेत्राकडून महिन्याकाठी केले जाणारे मोफत एटीएम व्यवहार तीनवर आणण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. ‘डिजिटल’ व्यवहारांना चालना मिळावी, म्हणून हा प्रस्ताव देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या प्रत्येक बँक स्वत:च्या एटीएममधून महिन्याकाठी एका एटीएम कार्डवरुन पाच मोफत व्यवहार करण्याची परवानगी देते. यानंतरच्या प्रत्येक व्यवहारासाठी बँकेकडून २० रुपये आकारले जातात. शिवाय या प्रत्येक व्यवहारावर सेवा शुल्क आकारले जाते. याशिवाय इतर बँकांच्या एटीएममधून तुम्ही दर महिन्याला तीन व्यवहार मोफत करता येतात. मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू आणि हैदराबादमध्ये ही सेवा उपलब्ध आहे. याशिवाय इतर शहरांमध्ये ग्राहकांना इतर बँकांच्या एटीएममधून पाच व्यवहार मोफत करता येतात. म्हणजेच स्वत:च्या बँकेचे एटीएम (५ मोफत व्यवहार) आणि इतर बँकांचे एटीएम (३ ते ५ मोफत व्यवहार) यांच्या माध्यमातून ग्राहकाला महिन्याकाठी साधारणत: ८ ते १० व्यवहार मोफत करता येतात. २०१४ मध्ये ही मोफत व्यवहारांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरात अभूतपूर्व चलनकल्लोळ निर्माण झाला. या काळात एटीएममध्येदेखील पुरेशी रोकड उपलब्ध नव्हती. त्यामुळे बरेच लोक डिजिटल व्यवहारांकडे वळले. त्यामुळे नोव्हेंबरनंतर एटीएममधून होणारे व्यवहार १० ते २० टक्क्यांनी घटले. एटीएममधून होणाऱ्या व्यवहारांमध्ये आणखी घट झाल्यास, एटीएम सेवा चालवणे आर्थिकदृष्ट्या कठीण होईल, असे अनेक बँकांकडून सांगण्यात येते आहे.