भारतातील देशद्रोही घटकांमध्ये भाजप हा सर्वाधिक देशद्रोही असल्याची टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. इतकेच नव्हे तर भाजपकडूनच जेएनयूमध्ये देशद्रोही घोषणा देणाऱ्यांना संरक्षण देण्यात येत असल्याचा आरोपही केजरीवालांनी केला. त्यांच्या या विधानामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. केजरीवाल यांनी बुधवारी सकाळी ट्विटरवरून यासंदर्भात भाष्य केले. ९ फेब्रुवारी रोजी जेएनयूच्या आवारात देण्यात आलेल्या देशविरोधी घोषणा या विद्यापीठाबाहेरच्या गटाने दिल्याची माहिती जेएनयू समितीच्या अहवालात समोर आली होती. यापूर्वीही केजरीवालांनी जेएनयू प्रकरणावरून भाजपवर तोंडसुख घेतले होते. काश्मीरमध्ये मित्रपक्ष असलेल्या ‘पीडीपी’च्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती नाराज होऊ नयेत, यासाठीच भाजप जेएनयूतील खऱ्या देशद्रोह्यांना अटक करत नसल्याचे केजरीवलांनी म्हटले होते.