भाजपा खासदार संजय जैस्वाल यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करताना एक वादग्रस्त विधान केलं आहे. विदेशी महिलेच्या पोटी जन्माला आलेली व्यक्ती देशभक्त असू शकत नाही, असं ते म्हणाले. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं. दरम्यान, त्यांच्या या विधानानंतर पुन्हा एकदा देशातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
नेमकं काय म्हणाले संजय जैस्वाल?
जी व्यक्ती देशातील लोकशाही, न्यायालये आणि पत्रकारांना चुकीचं मानते, अशा व्यक्तीवर विश्वास ठेवता येणार नाही. खरं विदेशी महिलेच्या पोटी जन्माला आलेली व्यक्ती देशभक्त असूच शकत नाही. हेच दोन हजार वर्षांपूर्वी चाणाक्यनेही सांगितलं होतं. राहुल गांधींना बघितल्यानंतर त्यांच्या शब्दांची आठवण येते, अशी प्रतिक्रिया संजय जैस्वाल यांनी दिली.
पुढे बोलताना त्यांनी राहुल गांधींच्या मोदी आडनावासंदर्भात केलेल्या विधानावरूनही टीकास्र सोडलं. राहुल गांधींना मोदींना चोर म्हणून संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान केला आहे. न्यायालयाने त्यांना माफी मागण्याची संधी दिली होती. न्यायालयात ते माफी मागू शकले असते, मात्र, केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी त्यांनी माफी मागितली नाही, असे ते म्हणाले.