महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख (ATS Chief) सदानंद दाते यांची नियुक्ती राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) महासंचालक पदी करण्यात आली आहे. मोदी सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. २६/११ चा हल्ला झाला तेव्हा अतुलनीय शौर्य दाखवणारे अधिकारी म्हणजे सदानंद दाते. त्यांना आता मोदी सरकारने महत्त्वाची जबाबदारी दिली आहे.

१९९० च्या तुकडीत भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी असललेले दाते यांनी महाराष्ट्र पोलीस दलात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. मुंबई पोलीस पोलीस दलात त्यांनी कायदा व सुव्यवस्था सहपोलीस आयुक्तपद भूषवले होते. याशिवाय मिरा-भाईंदर पोलीस दलाच्या आयुक्तपदाची धुराही दाते यांनी सांभाळली होती. केंद्रातही सीआरपीएफमध्ये प्रतिनियुक्तीवर त्यांनी काम केले होते. २६-११ ला मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातही त्यांनी शौर्य दाखवून दहशतवाद्यांना तोंड दिले. जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद, खलिस्तानी कारवाया आणि अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि जगाच्या इतर भागांतील दहशतवाद्यांचा तपास करण्याबरोबरच, एनआयएकडे पीएफआय संबंधीत तपास सुरू आहेत. त्यांच्याकाळात एटीएसने पाकिस्तानी हनीट्रॅप, बांगलादेशी नागरिकांविरोधील कारवाई, पीएफआयप्रकरणात छापेमारी अशा विविध कारवाया केल्या होत्या

सदानंद दातेंचा परिचय

सदानंद दाते हे मागच्या ३० वर्षांहून अधिक काळ पोलीस सेवेत कार्यरत आहेत. पोलीस सेवेतल्या विविध अनुभवांवर त्यांनी ‘वर्दीतील माणसांच्या नोंदी’ हे पुस्तक लिहिलं आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच त्यांना यूपीएससी संदर्भात कळलं. त्यावेळीच त्यांनी पोलीस सेवेत जायचा निर्णय घेतला. समाजासाठी काहीतरी करण्याचा ध्यास त्या वयात त्यांनी घेतला होता. यूपीएससी परीक्षा पास झाल्यानंतर आयएएस, आयपीएस आणि IA&AS असे तीन पर्याय होते. सदानंद दातेंनी आयपीएस हा पर्याय निवडला आणि पोलीस खात्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लहान असताना संघर्ष

सदानंद दाते यांनी पुण्यात १९७७ ते १९८८ या कालावधीत पेपर टाकण्याचंही काम केलं आहे. तर काही ठिकाणी शिपाई म्हणूनही काम केलं. घरातली परिस्थिती बेताची होती. वडिलांचं निधन सदानंद दाते आठवीत होते तेव्हा झालं. त्यानंतर त्यांच्या आईने त्यांना वाढवलं. शिक्षणासाठी काही कमी पडू दिलं नाही असं सदानंद दातेंनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.