Rahul Gandhi : काँग्रेस पक्षाचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वारंवार विदेश दौऱ्यावरून भारतीय जनता पक्षाचे नेते अमित मालवीय यांनी जोरदार टीका केली आहे. ‘राहुल गांधी वारंवार का गायब होतात?’ असा सवाल अमित मालवीय यांनी केला आहे. भाजपाने केलेल्या या टिकेनंतर अखेर काँग्रेसने राहुल गांधी यांच्या विदेश दौऱ्याबाबत आता स्पष्टीकरण दिलं आहे.

अमित मालवीय यांच्या आरोपांना उत्तर देताना काँग्रेसने म्हटलं की, राहुल गांधी हे त्यांच्या भाचीच्या पदवीदान समारंभाला उपस्थित राहण्यासाठी लंडनला गेले आहेत. तसेच ते लवकरच पुन्हा परत येतील, असं काँग्रेसने म्हटलं आहे. राहुल गांधी यांची भाची आणि प्रियांका गांधी वाड्रा यांची मुलगी मिराया ही यूकेमध्ये पदवीचं शिक्षण घेत असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

अमित मालवीय यांनी नेमकं काय म्हटलं होतं?

अमित मालवीय यांनी एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट लिहित म्हटलं होतं की, “राहुल गांधी गेल्या आठवड्यात सुट्टीचा आनंद घेण्यासाठी विदेश दौऱ्यावर होते. आता ते पुन्हा दुसऱ्यांदा लगेच विदेशात अज्ञात ठिकाणी गेले आहेत. राहुल गांधी अशा प्रकारे वारंवार का गायब होत आहेत? अशी कोणती सक्ती आहे की ते विदेश दौऱ्यावर असतात? मग विरोधी पक्षनेते म्हणून त्यांना भारतातील जनतेला उत्तर द्यावं लागेल”, असं अमित मालवीय यांनी म्हटलं आहे.

“सोशल मीडियावर अशीही चर्चा होती की ते बहरीनला गेले आहेत. राहुल गांधी यांच्या वारंवार होणाऱ्या विदेश दौऱ्यावरून काँग्रेसने स्पष्टीकरण दिलं पाहिजे. नवी दिल्लीहून लंडनला जाताना बहरीनसाठी बोर्डिंग पास घेऊन कोणीही लंडनला जात नाही. काँग्रेस खोटं बोलत आहे”, असं अमित मालवीय यांनी म्हटलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, भाजपाच्या आरोपानंतर काँग्रेसने लगेचच यावर प्रतिक्रिया दिली आणि भाजपाचे दावे हे प्रचार मोहिमेचा भाग असल्याचे सांगत आरोप फेटाळून लावले. काँग्रेसचे संपर्क प्रमुख पवन खेरा यांनी ट्विटरवरील एका पोस्टमध्ये म्हटलं की, “पीएमओ नेहमीप्रमाणे त्यांच्या युक्त्या करत आहेत. त्यांना दुसरे काही माहिती नाही. राहुल गांधी त्यांच्या भाचीच्या पदवीदान समारंभाला उपस्थित राहण्यासाठी लंडनला गेले आहेत आणि लवकरच परत येतील”, असं पवन खेरा यांनी म्हटलं. दरम्यान, काँग्रेस नेत्याच्या वारंवार होणाऱ्या परदेश दौऱ्यांवरून भाजपाने याआधीही अनेकदा टीका केली आहे., तर काँग्रेस पक्षाने अशा दौऱ्यांना वैयक्तिक असल्याचं सांगून त्यांचा बचाव केला आहे.