दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महिलांना मेट्रोतून मोफत प्रवासाची योजना जाहीर केली आहे. ही योजना लागू होण्यास विलंब असला तरी दिल्ली मेट्रोचे माजी प्रमुख ई श्रीधरन यांनी मात्र या योजनेला विरोध दर्शवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रस्तावाला विरोध करावा असं आवाहन ई श्रीधरन यांनी केलं आहे. यामुळे चुकीच्या गोष्टींना प्राधान्य मिळेल असं ई श्रीधरन यांचं म्हणणं आहे.

ई श्रीधरन यांनी यासंबंधी पंतप्रधान नरेंद्र पत्र लिहिलं आहे. ‘जर दिल्ली सरकारला महिलांची मदत करण्याची इतकीच इच्छा आहे, तर महिलांचा प्रवास मोफत करण्याऐवजी त्यांच्या प्रवासाचा खर्च थेट त्यांच्या खात्यात जमा करावा’, असं मत ई श्रीधरन यांनी पत्रात लिहिलं आहे. ‘मी तुम्हाला विनंती करतो सर, महिलांना मेट्रोत मोफत प्रवास करण्याच्या दिल्ली सरकारच्या प्रस्तावाला तुम्ही मान्यता देऊ नये. जर दिल्ली सरकारला मेट्रोतून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची काळजी आहे तर त्यांनी थेट प्रवासासाठी लागणारे पैसे त्या महिलांच्या खात्यात जमा करावेत’, असं ई श्रीधरन यांनी म्हटलं आहे.

महिलांना बस आणि मेट्रोचा मोफत प्रवास, दिल्ली सरकारचा निर्णय

२००२ रोजी दिल्ली मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली तेव्हाच आपण कोणालाही प्रवासात सूट द्यायची नाही हा निर्णय घेण्यात आला होता असं ई श्रीधरन यांनी सांगितलं आहे. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनीदेखील मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील उद्धाटनादरम्यान तिकीट काढलं होतं अशी माहिती दिली.

दिल्ली सरकारने महिलांसाठी बस आणि मेट्रोचा प्रवास मोफत केला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यासंबंधी घोषणा केली आहे. दिल्ली परिवहन मंडळाच्या बस, क्लस्टर बसेस आणि मेट्रो ट्रेनमध्ये महिलांना मोफत प्रवासाची सुविधा देण्यात येणार असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे.

‘जर दिल्ली सरकारने महिलांना प्रवासात सूट दिली तर इतर राज्यातील मेट्रोसाठीही धोक्याची घंटा असेल. दिल्ली सरकारने मेट्रोला होणारा तोटा आपण भरु केलेला दावा खूपच दयनीय आहे’, असंही ई श्रीधरन यांनी म्हटलं आहे.