दिल्लीतील सामूहिक बलात्काराची घटना निंदनीय असून भारताने अशा घटना रोखण्यासाठी ठोस पावले उचलावीत. मात्र या गुन्ह्यातील आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा देऊ नये, असे आश्चर्यकारक विधान संयुक्त राष्ट्रसंघटनेचे मानवी हक्क आयुक्त नावी पिल्ले यांनी केले.  दिल्ली बलात्कारपीडित २३ वर्षीय तरुणीचे निधन झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट पसरली असून जागतिक स्तरावरही या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली.
यूएन हक्क प्रमुख नावी पिल्ले म्हणाले की, २३ वर्षीय तरुणीचे निधन हे आगामी काळासाठी परिणामकारक वळण ठरेल. हा गुन्हा भयंकर असला तरी आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा हे त्यावरील उत्तर नाही, असेही ते म्हणाले.
महिलांच्या सुरक्षेसाठी समाजाची मानसिकता बदलण्याची गरज असून कायद्याची प्रभावी आणि संवेदनशीलपणे अंमलबजावणी करण्याची गरज आहे. भारताने सामाजिक चळवळींच्या माध्यमातून आपल्या प्रगल्भतेचे दर्शन घडवले असून अशा घटनांमध्येही भारत योग्य ती पावले उचलेल, असे पिल्ले म्हणाले.