Pakistani official Expulsion From India: भारताने बुधवारी नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयातील एका पाकिस्तानी अधिकाऱ्याला त्याच्या राजनैतिक दर्जाशी विसंगत कारवाया केल्याबद्दल पर्सना नॉन ग्राटा घोषित करून हद्दपार केले. सरकारने या अधिकाऱ्याला २४ तासांच्या आत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत.
“पाकिस्तान उच्चायुक्तालयाचे चार्ज डी’अफेअर्स यांना आज या संदर्भात एक निवेदन देण्यात आले असून, त्यांना भारतातील कोणताही पाकिस्तानी राजदूत किंवा अधिकारी त्यांच्या विशेषाधिकारांचा आणि पदाचा कोणत्याही प्रकारे गैरवापर करणार नाही याची काटेकोरपणे खात्री करण्यास सांगण्यात आले आहे,” असे परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात या प्रकरणाची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. यामध्ये म्हटले आहे की, “नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात काम करणाऱ्या एका पाकिस्तानी अधिकाऱ्याला भारतातील त्याच्या अधिकृत दर्जाशी विसंगत कारवाया केल्याबद्दल भारत सरकारने अयोग्य व्यक्ती म्हणून घोषित केले आहे. या अधिकाऱ्याला २४ तासांच्या आत भारत सोडण्यास सांगण्यात आले आहे.”
यात पुढे असेही म्हटले आहे की, “पाकिस्तान उच्चायुक्तालयाच्या चार्ज डी अफेअर्सना आज या संदर्भात एक डिमार्च जारी करण्यात आला असून, यामध्ये भारतातील कोणताही पाकिस्तानी राजदूत किंवा अधिकारी त्यांच्या विशेषाधिकारांचा आणि दर्जाचा कोणत्याही प्रकारे गैरवापर करणार नाही याची काटेकोरपणे खात्री करण्यास सांगण्यात आले आहे.”
या महिन्यात भारताने पाकिस्तानी अधिकाऱ्याची केलेली ही दुसरी हकालपट्टी आहे. १३ मे रोजी, आणखी एका पाकिस्तानी अधिकाऱ्याला त्याच्या दर्जाशी विसंगत कारवाया केल्याबद्दल हकालपट्टी करण्यात आली होती. दरम्यान, सरकारने त्या अधिकाऱ्याचे नाव किंवा त्याच्या कृतींचे स्वरूप उघड केले नव्हते.
दोन्ही देशांमधील संबंध आधीच ताणलेले असताना राजनैतिक तणाव निर्माण झाला आहे. २२ एप्रिल रोजी पहलाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान व पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ले करत ते उद्ध्वस्त केले होते.
तत्पूर्वी भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पाऊले उचलत सिंधू जल कराराला स्थगिती दिली होती. तसेच पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला होता. पुढे पाकिस्तानने सीमेलगतच्या काही भारतीय शहरांवर हवाई हल्ले करण्याचे अयशस्वी प्रयत्न केले होते. जे भारतीय लष्कराने सडेतोड प्रत्युत्तर देत हाणून पाडले होते.