लक्षद्वीप बेटांवर तळ विकसित करण्याची योजना भारतीय नौदल बनवत असून सागरी संरक्षणाचा महत्त्वाचा भाग असलेल्या सामरिक तळाला यात प्राधान्य दिले जाणार असल्याचे व्हाइस अॅडमिरल एसपीएस चिमा यांनी बुधवारी येथे सांगितले.परिचलन तळाकरिता लक्षद्वीप बेटांची निवड करण्यात आली आहे. यासाठी पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी नौदल शक्याशक्यता पडताळून पाहत आहे. यासाठी बित्रा बेटाला केंद्र सरकारने नुकतीच मान्यता दिली असून नौदलाचा हा चौथा तळ असेल.नौदलाचे प्रशिक्षण जहाज असलेल्या ‘आयएनएस-तीर’वरून पत्रकारांशी बोलताना चिमा यांनी ही माहिती दिली. लक्षद्वीप बेटावरील मिनीकॉय, कावारती, अंद्रोत येथे नौदलाचे तळ आहेत. सागरी रडार शृंखलेच्या पहिल्या टप्प्यातील विकासाचा भाग म्हणून लक्षद्वीपमध्ये सहा रडार केंद्रे आणि केरळमध्ये चार रडार केंद्रे आहेत, असे चिमा म्हणाले. व्हाइस अॅडमिरल चिमा हे या प्रदेशासाठीचे सागरी संरक्षण कमांडर इन चीफ आहेत. सागरी प्रदेशावर भारताचे आर्थिक हित केंद्रित झाले आहे आणि त्याची संपूर्ण सुरक्षा हे नौदलाची प्रमुख जबाबदारी आहे. देशाच्या उद्योगाचा सर्वाधिक वाटा सागरी मार्गावर अवलंबून असतो. या सागरी सीमा येत्या काळात संरक्षित करण्यात आल्या नाहीत, तर जनतेच्या प्रगतीला त्यामुळे खीळ बसण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले. यासाठी २५ एकर जमीन संपादित केली जाईल, तर समुद्राकडील ६५० एकर जमिनीचा विकास करण्याचा प्रस्ताव आहे. २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर सागरी सीमा सुरक्षा सर्वात मोठी जबाबदारी बनली आहे. एका हातात शत्रूशी लढण्यासाठी शस्त्र घेताना दुसऱ्या बाजूला दहशतवादी आणि चाच्यांशी दोन हात करण्याचीही जबाबदारी नौदलावर असते, असे ते म्हणाले.