PM Modi High Level Security Meeting Today Highlight : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात तब्बल २६ पर्यटकांचा मृत्यू झाला तर अनेकजण गंभीर जखमी झाले. या दहशतवादी हल्यानंतर संपूर्ण देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिलं असल्याची माहिती समोर आली आहे. आता काय काय घडतं ते आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊ.
Pahalgam Terror Attack Highlights : पहलगाम हल्ल्याविरोधात भारत आक्रमक, पाकिस्तानला उत्तर देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे निर्देश, यासह महत्त्वाच्या घडामोडी
जम्मू आणि काश्मीरमधील सीमेलगतच्या भागांमध्ये स्थानिकांकडून बंकरची साफ सफाई करण्यास सुरूवात
आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधी उल्लंघन केले जात आहे, यादरम्यान जम्मू काश्मीरच्या अखनूरच्या परगवाल सेक्टरमधील सीमेलगतच्या गावांमध्ये तणाव निर्माण झाला आहे, त्यामुळे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी स्थानिकांनी बंकर साफ करण्यास सुरुवात केली आहे.
Pahalgam Terror Attack: कोण आहेत NSAB चे नवे प्रमुख आलोक जोशी? जेएनयू ते रॉ व्हाया IPS!
राहुल गांधींनी घेतली पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या शुभम द्विवेदी यांच्या कुटुंबाची भेट
लोकसभा खासदार आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले कानपूर येथील रहिवासी शुभम द्विवेदी यांच्या कुटुंबाची भेट घेतली. राहुल गांधी यावेळी दहशतवादी हल्ल्यात ज्यांनी आपले प्राण गमावले आहेत त्यांच्यासाठी एक विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे अशी मागणी केली.
पहलगाम हल्ल्याबाबत शरद पवारांनी काय म्हटलं आहे?
पहलगाममध्ये जे झालं तो देशावरचा हल्ला आहे. या हल्ल्यात धर्म, जात, पात भाषा या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत. देशवासीय म्हणून कशाचीही अपेक्षा न करता आपल्याला एकत्र यावं लागेल. देशाचे पंतप्रधान आणि अन्य सहकारी हे यासंबंधी जी उपाय योजना करतील त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. हीच भूमिका आमची आहे. पहलगाम प्रश्न विशेष अधिवेशन बोलवण्याची जी मागणी केली आहे ती योग्यच आहे. कारण पहलगाम प्रश्नी संपूर्ण देश एक आहे. कुठलेही पक्ष सरकारच्या भूमिकेच्या विरोधात नाहीत हे दाखवण्यासाठी विशेष अधिवेशन घेणं हे उपयुक्त ठरेल असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
२७ युट्यूब चॅनल्सवर बंदी घातली याला बदला म्हणतात का?-संजय राऊत यांचा सवाल
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर त्याला पहिल्या २४ तासांत उत्तर द्यायला हवे होतं. जगभरात याचप्रकारे बदला घेतला जातो. एक सैनिक जरी मारला गेला तर अमेरिका, रशिया आणि इस्रायलसारखी राष्ट्रे तातडीने प्रत्युत्तर देतात. आम्ही पाणी बंद केल्याचे सांगितले गेले. पण पाणी असे बंद होत नाही. त्यासाठी साठवणूक क्षमता करावी लागेल. बंधारे बांधावे लागतील. यासाठी २० वर्ष लागतील. पण आपण पाकिस्तानच्या २७ युट्यूब चॅनेलवर बंदी घातली. याला बदला म्हणतात का? असा प्रश्न विचारत संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
पहलगाम हल्ल्यानंतर वैष्णो देवीला जाणाऱ्या यात्रेकरुंचं प्रमाण झालं कमी
काश्मीरच्या पहलगाम या ठिकाणी झालेल्या हल्ल्यानंतर वैष्णो देवीच्या यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरुंची संख्या घटली आहे. अनेक पर्यटकांनी या हल्ल्यानंतर बुकिंग रद्द केली आहेत. माता वैष्णो देवी श्राईन बोर्डाचे अधिकारी अंशुल गर्ग यांनी सांगितलं की भक्तांची सुरक्षा, सुविधा याची व्यवस्था योग्य प्रकारे पाहिली जाते आहे.ही यात्रा सुनोयिजतपणे सुरु आहे. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये यात्रेकरुंची संख्या कमी झाली आहे. आम्ही इथे येणाऱ्या भक्तांसाठी २४ तास कार्यरत आहोत असंही गर्ग यांनी सांगितलं.
'येत्या २४-३६ तासांत भारत लष्करी कारवाई करू शकतो', पाकिस्तानच्या मंत्र्याचा दावा
भारत पाकिस्तानाशी संयुक्त राष्ट्राच्या महासचिवांची चर्चा, संघर्ष टाळण्याचा सल्ला
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातला तणाव वाढला आहे. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव एंटोनियो गुटेरेस आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी याबाबत फोनवरुन चर्चा केली. पहलगाम हल्ल्याचा त्यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. दोन्ही देशांनी संघर्ष टाळता आला तर बघावं असा सल्लाही दिल्याचं कळतं आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात तब्बल २६ पर्यटकांचा मृत्यू झाला तर अनेकजण गंभीर जखमी झाले. या दहशतवादी हल्यानंतर संपूर्ण देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.
काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मंगळवारी २९ एप्रिल रोजी भंडारा बंदचे आवाहन करण्यात आले.