बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यावर पलटवार केला आहे. त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले की, प्रशांत किशोर यांना आम्ही बोलावलं नव्हतं. ते स्वत:च आले होते. ते त्यांना वाटेल तसं बोलतात, आम्हाला काही देणंघेणं नाही. या लोकांचा काही ठिकाणा नाही, सध्या भाजपात गेले आहेत, त्याचप्रमाणे काम करतील.

काही दिवसांपूर्वी प्रशांत किशोर यांनी, मला नितीश कुमार यांनी घरी बोलावले होते आणि पक्षाचे नेतृत्व करण्यास सांगितले होते, मात्र मी त्याला नकार दिला. असं खळबळजनक विधान केलं होतं. यावर मुख्यमंत्री नितीश कुमारांनी वरील प्रतिक्रिया दिली.

नितीश कुमार म्हणाले की, “एक वेळ होती जेव्हा प्रशांत किशोर माझ्यासोबत होते, माझ्या घरी राहत होते. त्यांच्याबद्दल आता आम्ही काय बोलावं, त्यांना जिथे जायचं तिथे त्यांनी जावं, आम्हाला काही देणेघेणे नाही. चार-पाच वर्ष अगोदर एकदा माझ्याकडे आले होते आणि पक्षाला काँग्रेसमध्ये विलीन करावं असं सांगत होते, आम्ही काय काँग्रेसमध्ये विलीन करणरा का?. या लोकांचा काही ठिकाणा नसतो, आज भाजपासोबत आहेत कुठं केंद्रात जागा मिळावी म्हणून आम्हा सर्वांचा विरोध करत आहेत.”

प्रशांत किशोर यांनी बिहारमध्ये सुरू केली पदयात्रा; ट्वीटद्वारे सांगितला उद्देश, म्हणाले…

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी जनसुराज्य पदयात्रा सुरू केली आहे. बिहारमधील चंपारण जिल्ह्यातील भितिहरवा येथील गांधी आश्रमातून या पदयात्रेस सुरूवात करण्यात आली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपाची साथ सोडल्यानंतर, प्रशांत किशोर यांच्या या पदयात्रेमुळे विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. तर प्रशांत किशोर यांनी या पदयात्रेच्या सुरुवातीस सांगितले आहे की, ते आणि त्यांची टीम अशी राजकीय व्यवस्था तयार करण्याचा विचार करत आहेत, जी एखद्या व्यक्ती, कुटुंब किंवा विशिष्ट सामाजिक संयोजनाविषयी नाहीतर संपूर्ण समाजासाठी असेल.