पीटीआय, कूचबिहार (पश्चिम बंगाल)

नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून (सीएए) अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोप करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी विरोधकांच्या ‘इंडिया आघाडी’वर टीकास्त्र सोडले. भारतमातेवर ज्यांची श्रद्धा आहे, त्यांना नागरिकत्व देण्याची ही ‘मोदी गॅरंटी’ आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

कूच बिहार येथील राश मेला मैदानावर झालेल्या जाहीर सभेत मोदी म्हणाले, की ईडीने कारवाई केलेल्या भ्रष्टाचारी नेत्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करीत आहेत. येत्या पाच वर्षांत भ्रष्टाचाऱ्यांवरील कारवाई आणखी कठोर करण्याबरोबरच त्यांना शिक्षा देण्याची हमी देण्याचा आपल्या आधीच्या वक्तव्याचा पुनरुच्चारही त्यांनी या वेळी केला.

हेही वाचा >>>“संदेशखाली प्रकरणातील गुन्हेगारांना संपूर्ण आयुष्य…”, पंतप्रधान मोदींचा इशारा; प. बंगालमधील सभेतून TMC वर टीका करत म्हणाले…

संदेशखालीमधील महिलांवर तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी अत्याचार केल्याच्या आरोपाचा संदर्भ देत मोदी म्हणाले,‘‘संदेशखाली प्रकरणातील दोषींना  त्यांचे उर्वरित आयुष्य तुरुंगात व्यतीत करावे लागणार आहे.’’

त्यांनी (इंडिया आघाडी) कधीच उपेक्षित समाजाची पर्वा केली नाही. आता आम्ही ‘सीएए’ लागू केला तर ते अफवा आणि खोटे पसरवत आहेत. भारतमातेवर ज्यांची श्रद्धा आहे, त्यांना नागरिकत्व देण्याची ही मोदी गॅरंटी आहे, अशी ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी दिली. ‘सीएए’मुळे देशाचे कायदेशीर नागरिक ‘परदेशी’ ठरतील या तृणमूल काँग्रेसह सर्व विरोधी पक्षांनी केलेल्या आरोपाच्या अनुषंगाने मोदी यांनी विरोधकांना लक्ष्य केले.