Industrialist Ratan Tata Died at 86 : प्रसिद्ध उद्योगपती आणि समाजसेवक रतन टाटा यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं. मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. आज त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. परंतु, उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देश दुःखात बुडाला आहे. अनेकजण त्यांच्यासाठी श्रद्धांजली वाहत आहेत. प्रसिद्ध व्यवसायिक आनंद महिंद्रा यांनीही त्यांच्या प्रती शोक व्यक्त केला आहे.

आनंद महिंद्रा यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग साईटवर रतन टाटांविषयी पोस्ट केली आहे. ते म्हणाले, “रतन टाटा यांची अनुपस्थिती मला स्वीकरता येत नाहीय. भारताची अर्थव्यवस्था ऐतिहासिक झेप घेण्याच्या उंबरठ्यावर उभी आहे आणि रतन टाटा यांच्या जीवनाचा आणि कार्याचा भारतीय अर्थव्यवस्थेशी खूप संबंध आहे. त्यामुळे या वेळी त्यांचे मार्गदर्शन बहुमोल ठरले असते. ते गेल्यावर, आपण फक्त त्यांच्या विचारांचं अनुकरण करू शकतो. कारण ते असे व्यापारी होते ज्यांच्यासाठी आर्थिक संपत्ती आणि यश हे जागतिक समुदायाच्या सेवेसाठी सर्वात जास्त उपयुक्त होते. तुम्हाला विसरलं जाणार नाही. कारण महापुरुष कधीच मरत नाहीत.”

हेही वाचा >> Ratan Tata Death : “रतन टाटा विलक्षण माणूस होते”, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही व्यक्त केल्या भावना

“रतन टाटा एक दूरदर्शी व्यापारी नेतृत्त्व, एक दयाळू व्यक्तीमत्त्व आणि एक विलक्षण माणूस होते. त्यांनी भारतातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित व्यावसायिक घराण्यांना स्थिर नेतृत्व दिले. त्यांचे योगदान बोर्डरूमच्या पलीकडे गेले. नम्रता, दयाळूपणा आणि आपल्या समाजाला अधिक चांगले बनविण्याच्या अतूट बांधिलकीमुळे ते लोकप्रिय ठरले. रतन टाटा यांच्या सर्वात अनोख्या पैलूंपैकी एक म्हणजे मोठी स्वप्ने पाहण्याची आवड. शिक्षण, आरोग्यसेवा, स्वच्छता, प्राणी कल्याण यासारख्या अनेक कारणांमध्ये ते आघाडीवर होते. रतन टाटा यांच्याशी झालेल्या असंख्य संवादांनी माझे मन भरून आले आहे. मी मुख्यमंत्री असताना त्यांना गुजरातमध्ये वारंवार भेटत असे. आम्ही विविध मुद्द्यांवर विचार विनिमय करत असू. मला त्यांचा दृष्टीकोन खूप समृद्ध वाटला. मी दिल्लीत आलो तेव्हाही हे संवाद सुरूच होते. त्यांच्या निधनाने अत्यंत दु:ख झाले आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.