Bilaspur Raipur Accident : सोमवारी पहाटे बिलासपूर-रायपूर महामार्गावर भीषण अपघातात एका कापड व्यापाऱ्याचा मृत्यू झाला, तर तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. १०० किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगाने जाणाऱ्या इनोव्हाच्या चालकाने गुटखा थुंकण्यासाठी दरवाजा उघडला आणि त्यामुळे गाडी अनेक वेळा उलटली, असं टाइम्स ऑफ इंडियाने वृत्त दिलं आहे.
बिलासपूर मार्गावर कसा झाला अपघात?
बिलासपूरच्या चाकरभाठा येथील व्यापारी जॅकी गेही (३१) रविवारी रात्री पार्टीला गेला होता. पहाटे १.३० च्या सुमारास त्याने त्याचा मित्र आकाश चांदणी याला त्याला घेण्यासाठी फोन केला. आकाश इनोव्हा गाडीने आला, त्याच्यासोबत त्याचा दुसरा मित्र पंकज छाब्रा होता. आकाश गाडी चालवत होता, पंकज पुढच्या सीटवर बसला होता आणि जॅकी मागे होता. हायवेवरून वेगाने जात असताना, आकाशने अचानक गुटखा थुंकण्यासाठी ड्रायव्हरच्या बाजूचा दरवाजा उघडला आणि त्यामुळे एसयूव्हीवरील नियंत्रण सुटले. गाडी दुभाजकाला धडकली, अनेक वेळा उलटली आणि तिघेही रस्त्यावर पडले. जॅकी दुभाजकाजवळील एका लोखंडी साहित्यात अडकला, त्यामुळे त्याच्या डोक्याला, छातीला आणि खांद्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला, असं अहवालात म्हटले आहे.
पार्क केलेल्या गाड्याही उडवल्या
तर, आकाश आणि पंकज यांना गंभीर दुखापत झाली. गाडी सतत उलटत राहिली आणि एका उभ्या असलेल्या वाहनाला धडकली आणि नंतर पार्क केलेल्या एर्टिगा गाडीला धडकली. यामुळे गाडीचा चालक जखमी झाला.हा भयानक अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. फुटेजमध्ये गाडी रस्त्यावरून पलटी होताना आणि त्यातील एक प्रवासी बाहेर पडून खांबावर आदळताना दिसत आहे.
दरम्यान, पाचदारांनी आपत्कालीन सेवांना माहिती दिली आणि पोलीसही तिथे तत्काळ घटनास्थळी पोहोचले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ढिगारा साफ करण्यात आला आणि परिसर सुरक्षित करण्यात आला. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.