नवी दिल्ली : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संगनमताने सामनानिश्चिती झाली असून आगामी बिहार विधानसभा निवडणुकीतही त्याची पुनरावृत्ती केली जाईल, असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केल्यानंतर शनिवारी राजकीय रणकंदन माजले. निवडणुकीचा प्रतिकूल निकाल लागल्यानंतर, निवडणूक आयोगाने निकालाशी तडजोड केली, असा आरोप हास्यास्पद व बिनबुडाचा असल्याचे प्रत्युत्तर केंद्रीय निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘लोकसत्ता’ व ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये लिहिलेल्या लेखाद्वारे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर पुन्हा एकदा शंका व्यक्त केली. देशातील निवडणुकांच्या प्रक्रियेमध्ये गैरप्रकार करून निकालांवर कब्जा कसा केला जातो हे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील निकालांवरून सिद्ध होते. एकप्रकारे हा निकाल म्हणजे निवडणूक निकाल कसे फिरवले जातात हा आराखडाच होता, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. याशिवाय, केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती समितीत फेरफार केला गेला. मतदारयाद्यांमध्ये बनावट मतदारांचा समावेश केला गेला. प्रत्यक्ष मतदानापेक्षा मतांचा टक्का कृत्रिमरीत्या वाढवला गेला. भाजपला जिंकण्यासाठी वाढीव मतांची गरज होती, त्याच मतदारसंघांमध्ये बोगस मतदान केले गेले. या सर्व गैरप्रकाराचे पुरावे लपवले गेले, असे पाच आक्षेप राहुल गांधींनी घेतले आहेत.

हजारो प्रतिनिधींची बदनामी

राहुल गांधी व काँग्रेसच्या आक्षेपांचे शंकानिरसन केल्यानंतर देखील पुन्हा तेच तेच आरोप करणे हास्यास्पद आहे, अशी खरमरीत टिप्पणी केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी केली. कोणाकडूनही पसरवली जाणारी चुकीची माहिती केवळ कायद्याचाच अपमान ठरत नाही तर, राजकीय पक्षाने नियुक्त केलेल्या हजारो प्रतिनिधींचीही बदनामी ठरते. निवडणुकीदरम्यान अथक व पारदर्शकपणे काम करणाऱ्या लाखो निवडणूक कर्मचाऱ्यांनाही निराश करणारी ठरते, अशीही टीका शनिवारी आयोगाने केली.

यापूर्वीही राहुल गांधींनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत साशंकता व्यक्त केली होती. त्यासंदर्भात काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाला लेखी पत्र पाठवून स्पष्टीकरणही मागितले होते. २४ डिसेंबर २०२४ रोजी आयोगाने काँग्रेसचे आक्षेप फेटाळत लेखी प्रत्युत्तरही दिले होते. राहुल गांधींच्या आरोपानंतर आयोगाने शनिवारी हेच लेखी प्रत्युत्तर पुन्हा प्रसिद्ध केले. गेल्या वर्षी झालेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना-ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गट या तीन पक्षांच्या महाआघाडीचा दारुण पराभव झाला होता. या निवडणुकीत विरोधकांच्या महाआघाडीला २८८ पैकी फक्त ४६ जागा जिंकता आल्या होत्या. या निकालानंतर राहुल गांधींनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राहुल गांधी यांनी आकडेवारीसह मांडलेले सत्य हा निव्वळ लेख नाही तर लोकशाहीवरील योजनाबद्ध केलेल्या आघाताचा दस्तऐवज आहे. लोकशाही संस्थांना ताब्यात घेऊन जनमताची चोरी करण्यात आली. – रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रभारी, महाराष्ट्र