RCB Victory Parade Stampede बंगळुरुतल्या चिन्नास्वामी मैदानाबाहेर आरसीबीच्या विजयी मिरवणुकीच्या वेळी जी चेंगराचेंगरी झाली त्यात ११ जणांचा मृत्यू झाला तर ४७ जण जखमी झाले. ४ जूनला घडलेली घटना अजूनही चर्चेत आहे. या चेंगराचेंगरीत ज्यांचा बळी गेला ते सगळे तरुण-तरुणीच होते. दरम्यान एका २१ वर्षीय मुलालाही या चेंगराचेंगरीत प्राण गमवावे लागले. त्याच्या वडिलांचा हृदय पिळवटून टाकणारा एक व्हिडीओ समोर आला आहे.

नेमकं या व्हिडीओत काय आहे?

२१ वर्षीय भूमिक लक्ष्मण याचा बंगळुरुच्या चेंगराचेंगरीत मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या पार्थिवावर जेव्हा अंत्यसंस्कार करण्यात आले तेव्हा त्याचे अंत्यसंस्कार ज्या ठिकाणी झाले त्या ठिकाणी वडील टाहो फोडताना दिसत आहेत. मला इथून जायचं नाही म्हणत त्यांनी टाहो फोडला. लक्ष्मणचा मृतदेह मातीत पुरण्यात आला. त्यानंतर त्या ठिकाणी डोकं ठेवून त्याचे वडील रडू लागले आणि मला इथून जायचं नाही म्हणत त्यांनी टाहोच फोडला. मुलगा जाण्याचं दुःख काय असतं हे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोन जण त्यांना उचलण्याचा प्रयत्न करतात पण तरीही ते आणखी रडू लागतात आणि मुलाला आर्त हाका मारु लागतात असा हा व्हिडीओ आहे जो पाहून कुणाच्याही डोळ्यांमध्ये पाणी येईल. सुनील शुक्ला यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्याचप्रमाणे विविध अकाऊंट्स वरुन हा व्हिडीओ पोस्ट केला जातो आहे.

मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी दिली ११ मृत्यू झाल्याची माहिती

आरसीबीने १८ वर्षांनी आयपीएलचा अंतिम सामना जिंकला. ४ जूनला त्यांची विजयी परेड निघाली. या विजयी परेडच्या आधी चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली. या चेंगराचेंगरीत ४७ जण जखमी झाले आहेत, चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी दिली. सुरुवातीला मृतांच्या नातेवाईकांना दहा लाखांची मदत जाहीर करण्यात आली होती. आता ही मदत २५ लाख रुपये करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मैदानाबाहेर गर्दी नेमकी कशी वाढत गेली?

काही लोक झाडांवर चढून बसले. काहींनी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या इमारतीत जाण्याचा पर्याय निवडला. त्यामुळे बघता बघता गर्दी प्रचंड प्रमाणात वाढली. या ठिकाणी गर्दी झाल्याने या भागात थांबणाऱ्या मेट्रोनेही मेट्रो या भागात थांबणार नाही असं जाहीर केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ४ जूनच्या दुपारी ३ च्या सुमारास १ किमीच्या परिसरात साधारण ५० हजार लोक जमा झाले होते. अनेकांकडे व्हिक्टरी परेडची तिकिटं होती, बहुतांश गर्दीकडे ही तिकिटं नव्हती. फ्री तिकिटं मिळतील यासाठी ते आले होते. आपल्या आवडत्या क्रिकेटर्सनला आणि खास करुन विराट कोहलीला डोळे भरुन बघावं ही या सगळ्यांचीच इच्छा होती. मात्र प्रचंड प्रमाणात गर्दी झाल्याने ११ जणांचा मृत्यू झाला. यातील भूमिक लक्ष्मणच्या वडिलांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.