राज्यसभेत प्रचंड गदारोळात कृषि विषयक दोन विधेयके मंजूर झाली. ही विधेयकं राज्यसभेत मांडल्यानंतर काँग्रेससह विरोधी पक्षांनी सरकारला प्रचंड विरोध केला. तर, दिल्ली, हरयाणा या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांसह शेकडो शेतकरी या आंदोलनात रस्त्यांवर उतरल्याचे दिसून आले. या विधेयकांच्या मंजूरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून शेतकऱ्यांना ‘एमएसपी’बद्दल ग्वाही देखील दिली. यावर आता अभिनेत्री कंगना रणौत हिने मोदींच्या ट्विटला रिट्विट करत त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले व या विधेयकांना विरोध करणाऱ्यांवर टीका केल्याचे दिसून आले आहे.

कृषी विधेयकांवरुन रविवारी राज्यसभेत अभूतपर्वू गोंधळ पाहण्यास मिळाला. विरोधकांच्या घोषणाबाजी आणि प्रचंड गदारोळात आवाजी मतदान घेत दोन्ही कृषी विधेयकं मंजूर करुन घेण्यात आली. ही विधेयकं राज्यसभेत मांडल्यानंतर काँग्रेससह विरोधी पक्षांनी सरकारला प्रचंड विरोध केला. तर, दिल्ली, हरयाणा या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांसह शेकडो शेतकरी या आंदोलनात रस्त्यांवर उतरल्याचे दिसून आले. या विधेयकांना विरोध करणाऱ्यांचा उल्लेख अभिनेत्री कंगना रणौत हिने दहशतवादी असा केला. यावरुनच आता माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी कंगनाला सुनावले आहे. सिन्हा यांनी कंगनाचा उपरोधिकपणे राष्ट्रीय नेता असा उल्लेख करत तिला टोला लगावला आहे.

आंदोलनकर्त्यांचा उल्लेख दहशतवादी असा करणाऱ्या कंगनाला सिन्हा यांनी ट्विटवरुनच टोला लगावला आहे. “आता महान राष्ट्रीय नेत्या कंगना रणौत यांच्या सांगण्याप्रमाणे कृषि विधेयकांना विरोध करणारे दशतवादी आहेत. आधी आपण सर्व देशद्रोही होतो आणि आता आपण सगळे दहशतवादी झालोय. ठरकी लोकं,” असं ट्विट सिन्हा यांनी कंगनाचा थेट उल्लेख करत केलं आहे.


कंगना काय म्हणाली होती?

ही विधेयक मंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून शेतकऱ्यांना एमएसपी व्यवस्था कायम राहणार असल्याची ग्वाही दिली. “मी आधीही बोललो आहे. पुन्हा एकदा सांगतो एमएसपी व्यवस्था कायम राहिल. सरकारी खरेदी कायम राहिल. आम्ही इथे शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आहोत. आम्ही अन्नदात्यांच्या मदतीसाठी शक्य होईल तितके प्रयत्न करू आणि त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांचं जगणं अधिक सुखकर करू,” असं मोदी यांनी म्हटलं होतं. मोदींच्या याच ट्विटवर प्रतिक्रिया देताना कंगनाने आंदोलकर्त्यांना दहशतवादी म्हटलं. “प्रधानमंत्रीजी कोणी झोपलं असेल तर त्याला जाग केलं जाऊ शकतं, ज्याला गैरसमज असेल त्याला समजावलं जाऊ शकतं. मात्र जे झोपण्याचं नाटक करत आहेत, न समजल्याचं नाटक करत आहेत. त्यांना तुमच्या समजावण्याने काय फरक पडणार? हे तेच दहशतवादी आहे सीएएमुळे एकाही व्यक्तीचे नागरिकत्व गेले नाही मात्र त्यांनी रक्ताचे पाट वाहून टाकले,” असं कंगनाने मोदींच्या ट्विटवर प्रतिक्रियादा देताना म्हटलं होतं. या ट्विटमधून कंगनााने कृषि विधेयकांना विरोध करणाऱ्यांवर निशाणा साधला होता.

आठ खासदार निलंबित

राज्यसभेत शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी ही दोन्ही विधेयके आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आली. ही विधेयक केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सभागृहात मांडली. चर्चेवेळी विरोधकांनी विधेयकांनी प्रचंड विरोध करत घोषणाबाजी केली. या गदारोळातच विधेयक मंजूरीसाठी आवाजी मतदान घेण्यात आलं. राज्यसभेतील विरोधी पक्ष सदस्यांकडून वेलमध्ये उतरुन करण्यात आलेली घोषणाबाजी तसंच नियमपुस्तिका फाडण्याचा प्रयत्न याची गंभीर दखल घेण्यात आली. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या निवासस्थानी रविवारी उच्चस्तरीय बैठक पार पडली. यानंतर आठ सदस्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. उपसभापींसोबत केलेल्या गैरवर्तनासाठी एका आठवड्यासाठी ही कारवाई करण्यात आली. निलंबन करण्यात आलेल्या खासदारांमध्ये टीमएमसीचे डेरेक ओब्रियन, डोला सेन, आम आदमी पक्षाचे संजय सिंह, काँग्रेसचे राजीव सातव, रिपून बोरा आणि सय्यद नासिर हुससैन, सीपीआय (एम)चे के के रागेश आणि एल्मलारन करीम यांचा समावेश आहे.