देशात लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. उमेदवार आपापल्या मतदारसंघात पूर्ण ताकदीने प्रचार करत आहेत .उद्या (७ मे) लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. या मतदारसंघांमध्ये रविवारी (५ मे) सायंकाळपासून आचारसंहिता लागली आहे. दरम्यान या मतदारसंघातील उमेदवारांनी काल शेवटचा प्रचार केला. जालना लोकसभेचे उमेदवार आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काल जालन्यात अनेक प्रचारसभा घेतल्या. यावेळी दानवे म्हणाले, मी राजकारणातील सासू आहे तर अर्जुन खोतकर माझी राजकारणातील सून आहे.

रावसाहेब दानवे म्हणाले, मी मतदारसंघात चांगलं काम केलं म्हणून लोकांनी मला खासदार केलं. मी खासदार म्हणून चांगलं काम केलं, मग मला मंत्री केलं. मतदारसंघात केंद्रातून पैसे आणणं हे माझं काम आहे आणि आणलेला पैसा कसा खर्च करायचा हे इथले आमचे लोक आमदार आणि इतर लोकप्रतिनिधी ठरवतात.

रावसाहेब दानवे अर्जुन खोतकरांसह जालना लोकसभेतील इतर आमदारांना उद्देशून म्हणाले, पैसे खर्च करणं हे तुमचं काम आहे. उद्घाटनाला यायची जबाबदारी आमची नाही. तुम्ही परस्पर उद्घाटन करता आणि लोकांना सांगता की हे काम रावसाहेबांमुळे झालं. मी पैसे आणतो, तुम्ही काम करता. मला या माध्यमातून आज लोकांना एवढंच सांगायचं आहे की बियाण्यांचं खातं राज्य सरकारकडे आहे, केंद्राकडे नाही. सिंचन खातं, वीज वितरण खातं आणि इतर खातीसुद्धा राज्याकडे आहेत. त्यामुळे मी मतदारसंघात काही काम केलं नाही असं नाही. मित्रांनो केंद्र सरकार वेगळ्या पद्धतीने काम करतं. राज्य सरकार वेगळ्या पद्धतीने काम करतं. मी पैसे आणतो आणि इथले आमदार ते पैसे तुमच्यासाठी खर्च करतात.

मी राजकारणातली सासू आहे आणि अर्जुन खोतकर, अरविंद या माझ्या राजकारणातील सुना आहेत. सुनेच्या हाती कारभार गेला की सासूचं फक्त एकच काम असतं, सासूला फक्त आणायला सांगतात, मात्र आणलेले पैसे वाटण्यासाठी सुनाच उपस्थित असतात. त्यामुळे माझी भूमिका सर्वांनी लक्षात घ्यावी. तुम्ही मला खासदार केलं, तुम्हाला आता वाटत असेल तर तुम्ही पुढच्या निवडणुकीत अर्जुन खोतकर यांना खासदार करा आणि मला तुमचा आमदार करा. मग मी तुमच्या गावागावात यायला तयार आहे. मग मला कोणी प्रश्न विचारले तर त्याला उत्तर द्यायला मी तयार आहे.

हे ही वाचा >> मध्यरात्री मोठी घडामोड, उद्धव ठाकरे गटाचा नाराज नेता शिंदेंच्या शिवसेनेत, नाशिकमध्ये ट्विस्ट!

रावसाहेब दानवे म्हणाले, काहीजण म्हणतात की मी खानदानी श्रीमंत आहे, ही काय टीका आहे का? मला सर्वांना सांगायचं आहे की मी त्यांच्या गावात (विरोधकांच्या) मोठं मताधिक्य घेतो. तुम्ही तर माझे गाववाले आहात. तुम्ही मला अधिक मतं दिली पाहिजेत. मुळात केंद्रात मंत्री कोण असतो तर ज्याचा बाप, ज्याचा आजा केंद्रात मंत्री होता… माझे तर बाप पण तुम्ही आणि आजोबापण तुम्ही… मी सासू असलो आणि या माझ्या सुन्या असल्या तरी माझे मायबाप, माझे आजोबा तुम्हीच आहात. त्यामुळे तुम्हाला ठरवावं लागेल केंद्रात आपला प्रतिनिधी हवा की नको? अनेकांना वाटतं जालन्याचा खासदार केंद्रात मंत्री झालाच कसा? मला त्यांना सांगायचं आहे की मला आमच्या लोकांनीच खासदार केलं आहे. मी जेव्हा राष्ट्रपतींबरोबर, पंतप्रधानांबरोबर बसतो तेव्हा माझ्या डोळ्यापुढे माझ्या मतदारसंघातले लोक