आयपीएलच्या तेराव्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या दुर्दैवाचे दशावतार कायम सुरु आहेत. प्ले-ऑफच्या सामन्यात खेळत असताना मधल्या काही षटकांमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर दिल्लीने अखेरच्या षटकांत धावांची खैरात करत मुंबईला द्विशतकी धावसंख्येचा टप्पा गाठून दिला. यानंतर २०१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिल्लीची सुरुवातही अत्यंत खराब झाली.

सलामीवीर पृथ्वी शॉ पहिल्याच षटकात ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर माघारी परतला. एकही धाव न करता माघारी परतलेल्या शॉवर दिल्लीचे चाहते आणि नेटकरी चांगलेच भडकले आहेत.

जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट यांच्या भेदक माऱ्यासमोर दिल्लीचा संघ पुरता कोलमडला. पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, शिखर धवन हे तिन्ही सलामीवीर एकही धाव न काढता माघारी परतले. ५० धावसंख्येच्या आतच दिल्लीने आपला निम्मा संघ गमावला होता.