कोल्हापूर : विशाळगड येथील उरुसाला प्रशासनाने बंदी घातली असल्याने रविवारपासून सुरू झालेल्या उरुसाला येणाऱ्या भाविकांची संख्या कमालीची रोडावली होती. गडावर जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कसून तपासणी केली जात होती. तर, नियमांचे पालन करून उरुस साजरा केला जाणार असल्याचे विश्वस्तांनी सांगितले.
विशालगडावर हजरत सय्यद मलिक रेहान बाबा दर्गा आहे. येथे ८ ते १२ जून या कालावधीत उरुस साजरा केला जातो. या उरुसला हिंदू-मुस्लिम भाविक येत असतात. गेली दोन वर्ष विशाळगडावरील वातावरण तणावाचे आहे. या पार्श्वभूमीवर हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले होते.
किल्ले विशाळगड हे राज्यसंरक्षित स्मारक असल्याने सध्याची संवेदनशील परिस्थिती लक्षात घेता संचालक, राज्य पुरातत्व विभाग यांनी किल्ल्यावरील उरुसास परवानगी नाकारली होती. याबाबत शाहूवाडी तहसीलदार यांनी विशाळगड किल्ल्याच्या परिसरामध्ये १५ जूनपर्यंत बंदी आदेश लागू केला आहे. या घडामोडींमुळे भाविकांनी किल्ले विशाळगडकडे पाठ फिरवल्याचे आज दिसून आले.
दरवर्षीच्या तुलनेने एक टक्के सुद्धा गर्दी दिसत नसल्याचे निरीक्षण भाविकच नोंदवत होते. भाविकांच्या वाहनांच्या रांगा गडाच्या पायथ्याला लागल्या होत्या. प्रत्येक भाविकांची पोलीस कसून तपासणी करीत होते. भाविकांची संख्या रोडावल्याने होणारी खरेदी विक्री मंदावली होती. विशाळगड आणि परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
उच्च न्यायालयाने गडावर उरुस काळात खासगी ठिकाणी बकरे आणि कोंबडी कापण्यासाठी परवानगी दिली होती. यासाठी सहायक आयुक्त पशुसंवर्धन यांनी दिलेल्या लेखी सुचनांचे पालन करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने दर्ग्याचे विश्वस्त यांना कळवले होते. त्यानुसार गडावर पत्र्याचे शेड मारून एक छोटेखानी कत्तलखाना तयार केला होता. यामध्ये चार बकरी, २३ कोंबडे कापले गेल्याची माहिती प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी दिली.