लोकसत्ता : पश्चिम घाटात मुसळधार व कोल्हापूर – सांगली जिल्ह्यात संततधार यामुळे पंचगंगा, वारणा व कृष्णा नदीची पाणी पातळी वाढत आहे. पंचगंगा धोका पातळीकडे सरकू लागली असून कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे शिरोळ – हातकणंगले तालुक्यातील नदी काठावरील गावे महापूर येण्याच्या शक्यतेने धास्तावली आहेत. पाणी वाढतंय की कमी होतेय या विचाराने ग्रामस्थांची नागरिकांची घालमेल सुरू आहे.

कोल्हापूर जिल्ह्याला २००५, २००९, २०२१ मध्ये महापुराचा जोरदार तडाखा बसला होता. अपरिमित जीवित आणि वित्तीय हानी झाली होती. त्यातून हे तालुके पुरते सावरलेले नाहीत. तेव्हा तुटपुंजी मदत मिळाल्याने लोक हवालदिल झाले आहेत. त्यामुळे पुन्हा महापूर येऊ नये यासाठी देवाकडे प्रार्थना केली जात आहे.

हेही वाचा – पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत; रस्ते बंद, एसटी सेवेवर परिणाम

गेल्या काही दिवसापासून पावसाचा जोर वाढला आहे. पंचगंगा नदी पातळीत वाढ होत आहे. पावसाचा जोर असाच राहिला पुन्हा महापूर येण्याचे संकेत मिळत आहे. कृष्णा, वारणा, पंचगंगा नदीच्या पाण्यात वाढ होत असल्याने काठावरील गावांना भीतीच्या छायेखाली राहावे लागत आहे. महापुराच्या धास्तीने शेकऱ्यांची नदीकाठावरील शेतिकामाच्या विजेच्या मोटारी काढण्याची लगबग वाढली आहे. पुन्हा महापूर आला तर हजारो हेक्टर शेतीमधील पिकांचे नुकसान होणार असल्याने शेतकरी चिंतेत आहे. महापुराबाबत कर्नाटक व महाराष्ट्र सरकारमध्ये समन्वय ठेवण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा – कोल्हापूर : शिवनेरीवरील छत्रपती शिवरायांच्या पादुकांवर महालक्ष्मी मंदिरात अभिषेक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यंदा दुर्दैवाने महापूर संकटाला लोकांना सामोरे जावे लागले तर जबाबदारी प्रशासनाची आहे. राज्य शासनाने तातडीने कर्नाटक शासानाशी बोलणी करून महापूर रोखण्यासाठी गतीने प्रयत्न करावेत. अन्यथा लोक यांना माफ करणार नाहीत. – धनाजी चुडमुंगे, आंदोलन अंकुश शिरोळ