भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पहिला टी-२० सामना खेळवला जात आहे. या सामन्यामध्ये इंग्लंडनं टॉस जिंकून आधी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियानं तडाखेबाज सलामीवीर शिखर धवनचा समावेश केल्यामुळे सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी पाहायला मिळण्याच्या तयारीत असलेल्या टीम इंडियाला सुरुवातीलाच मोठे धक्के बसले. या सामन्यामध्ये भारताचा डाव अवघ्या १२४ धावांवरच आटोपला असून पहिल्या टी-२० सामन्यामध्ये विजयासाठी भारतानं इंग्लंडसमोर १२५ धावांंचं आव्हान ठेवलं आहे. भारताच्या धावांमध्ये सर्वाधिक वाटा हा श्रेयस अय्यरचा होता. श्रेयस अय्यरने ४८ चेंडूंत ८ चौकार आणि एका उत्तुंग षटकारासह ६७ धावांची खेळी केली. मात्र, भारताच्या इतर फलंदाजांनी निराशाच केल्यामुळे टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं.

त्याआधी डावाच्या सुरुवातीलाच भरवशाचा सलामीवीर के. एल. राहुल वैयक्तिक १ धावसंख्येवर बाद झाला. दुसऱ्याच षटकात बसलेल्या या धक्क्यतून टीम इंडिया सावरते, तोच खुद्द कर्णधार विराट कोहली जॉर्डनच्या बॉलिंगवर शून्यावर झेलबाद झाला. यानंतर शिखर धवन रिषभ पंतसोबत डाव सावरेल असं वाटत असतानाच भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या त्या समजालाही धक्का बसला आणि तडाखेबाज शिखर धवनने १२ चेंडूंमध्ये फक्त ४ धावा करून तंबूचा रस्ता धरला. वूडनं त्याला तंबूत माघारी धाडलं.

टीम इंडिया – के. एल. राहुल, शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल

टीम इंग्लंड – जेसन रॉय, जोस बटलर, डेविड मलन, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स, इयॉन मॉर्गन, सॅम करन, जोफ्रा आर्चर, ख्रिस जॉर्डन, आदिल राशिद, मार्क वूड