बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या बांगबंधू टी२० क्रिकेट स्पर्धेत एक सोमवारी एक विचित्र प्रकार घडला. स्पर्धेतील बाद फेरीचा सामना सोमवारी बेक्सिमो ढाका आणि फॉर्च्यून बरीसाल या दोन संघांत खेळवण्यात आला. या सामन्यात ढाका संघाचा कर्णधार मुश्फीकूर रहीमने सामना सुरू असताना एका सहकारी खेळाडू थेट हात उगारला होता. त्याच्या या कृत्यावर प्रचंड टीका करण्यात आली. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने त्याला सामन्यातील मानधनाच्या २५ टक्के रक्कम दंड ठोठवला. त्यानंतर अखेर मुश्फीकूरने फेसबुक पोस्ट लिहीत घडलेल्या प्रकाराबाबत माफी मागितली.

सर्वप्रथम मी सामन्यातील त्या चुकीच्या कृत्यासाठी माझ्या सहकाऱ्यांची आणि चाहत्यांची माफी मागतो. मी नसुमवर हात उगारल्याच्या घटनेबाबत मी त्याची सामना संपल्यानंतर लगेचच माफी मागितली. पण त्याचसोबत सर्व चाहत्यांनीही मला माफ करावं अशी माझी विनंती आहे. मी एक माणूस आहे. माझ्याकडून चूक झाली. मी केलेली कृती स्वीकारार्ह अजिबातच नव्हती. अशा प्रकारची चूक माझ्याकडून भविष्यात पुन्हा कधीही होणार नाही यीची मी खात्री देतो”, असा संदेश त्याने आपल्या फेसबुक वॉलवर पोस्ट करत साऱ्यांची माफी मागितली.

नक्की काय घडलं होतं…

सामन्यात ढाका संघाने २० षटकांत १५० धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना १७व्या षटकात एक विचित्र प्रकार घडला. अर्धशतकी खेळी केलेला असिफ याने शफिऊलने टाकलेला चेंडू मारला. चेंडू असिफच्या बॅटच्या कडेला लागला. त्यामुळे चेंडू उंच उडाला. विकेट किपर मुश्फीकूर आणि स्लिपमध्ये उभा असलेला फिल्डर नसुम अहमद दोघेही झेल घेण्याच्या प्रयत्नात होते. त्याचदरम्यान या दोघांची टक्कर झाली. मुश्फीकूरने झेल टिपला पण त्यानंतर त्याने भरमैदानात चक्क नसुमवर हात उगारला. इतर सहकाऱ्यांनी त्यांचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला, पण तरीही मुश्फीकूर नसुमवर आणखी काही ओरडतच राहिला.

घडलेला प्रकार नेटिझन्सच्या पचनी पडला नाही. क्रिकेटसारख्या सभ्य लोकांच्या खेळात अशाप्रकारची वर्तणूक करणं योग्य नसल्याचं अनेक क्रिकेटरसिकांचं मत दिसलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर संघाचे नेतृत्व केलेल्या मुश्फीकूरकडून अशाप्रकारच्या वर्तणुकीची अपेक्षा नसल्याचे अनेक ट्विट या घटनेनंतर नेटिझन्सकडून करण्यात आले.