भारतीय संघाचा उपकर्णधार विराट कोहलीने कोची येथे झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात ८६ धावांची खेळी केली आणि आंतराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांत सर्वात जलद ५००० धावा पूर्ण करणाऱयांच्या यादीत अव्वल स्थानी असेलेल्या माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांच्या विक्रमाशी बरोबरी साधली.
याबद्दल बोलत असतांना कोहली म्हणाला, मैदानात फलंदाजीला जात असताना केव्हाही कोणता विक्रम करायचा आहे असा विचार अजिबात नसतो. फक्त जाऊन चांगली फलंदाजी करायची आणि संघाला विजय प्राप्त करुन द्यायचा आहे. इतकेच ध्यानी असते. चांगली फलंदाजी होत गेली की विक्रम हे आपोआप होतात. त्यामुळे विक्रम करण्याकडे लक्ष न देता प्रत्येकवेळी फलंदाजी किती चांगली करता येईल याकडे माझे लक्ष असते. त्याचबरोबर विवियन रिचर्ड्स यांच्यासारख्या महान क्रिकेटविराच्या विक्रमाशी बरोबरी मी साधली याचा आनंदच आहे. परंतु, नुसते इथेच थांबून चालणार नाही आणखी चांगले क्रिकेट खेळायचे आहे. असेही विराट म्हणाला.