चेन्नई सुपरकिंग्ज संघातील दोन खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील १२ सदस्यांना करोनाची लागण झाल्यानंतर बीसीसीआयसमोर पुन्हा एकदा मोठं संकट निर्माण झालं आहे. १९ सप्टेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे, तरीही अद्याप स्पर्धेच्या वेळापत्रकाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. CSK च्या गोटात करोनाने शिरकाव केल्यामुळे बीसीसीआयने अद्याप वेळापत्रकाची घोषणा केलेली नसल्याचं समजतंय. १९ सप्टेंबरला रोहित शर्माची मुंबई इंडियन्स आणि महेंद्रसिंह धोनीची चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगण्याचे संकेत मिळत होते. परंतू चेन्नईच्या खेळाडूंना करोनाची लागण झाल्यानंतर सलामीच्या सामन्यात खेळण्याची चेन्नईची संधी हुकणार आहे. चेन्नईच्या बदल्यात मुंबई विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सलामीचा सामना रंगण्याचे संकेत मिळत आहेत.

“सलामीच्या सामन्यात कदाचीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला संधी मिळू शकते. स्पर्धेचा पहिला सामना असल्यामुळे तुम्हाला स्टार खेळाडू मैदानावर उतरवणं गरजेचं आहे. जर महेंद्रसिंह धोनीचा संघ खेळू शकणार नसेल तर नक्कीच विराटच्या संघाला संधी दिली जायला हवी.” अद्याप वेळापत्रकाबद्दल ठोस निर्णय झालेला नसला तरीही गव्हर्निंग काउन्सिलमधील विश्वसनीय सूत्रांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार सलामीच्या सामन्यात बदल करण्यात येणार आहेत.

अवश्य वाचा – IPL : रैनासाठी चेन्नईची दारं बंद?? CSK संघ व्यवस्थापन नाराज

दरम्यान करोनाग्रस्त आढळलेल्या चेन्नईच्या दोन्ही खेळाडूंना क्वारंटाइन करण्यात आलेलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून चेन्नईच्या इतर खेळाडूंचाही क्वारंटाइन कालावधी वाढवण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात गव्हर्निंग काऊन्सिल वेळापत्रकाची घोषणा कधी करतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 : CSK संघात नाराजीनाट्य?? केदारचा नाव न घेता रैनाला टोला