पाकिस्तानचा माजी लेगस्पिनर दानिश कनेरियाने रविवारी ४ डिसेंबर रोजी ढाका येथे बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या डावपेचांवर टीका केली आहे. त्याने बांगलादेशची शेवटची जोडी खेळपट्टीवर असताना ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदरला गोलंदाजी न करण्याच्या निर्णयाला धक्कादायक असल्याचे म्हटले. यजमानांनी रविवारी तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा एक विकेटने पराभव केला. १८७ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशची धावसंख्या १३६/९ अशी झाली होती. तथापि, मेहदी हसन मिराज (३९ चेंडूत ३८*) आणि मुस्तफिझूर रहमान (११ चेंडूत १०*) यांनी शेवटच्या विकेटसाठी ५१ धावांची अभेद्य भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला.

वॉशिंग्टन सुंदर (पाच षटकात २/१७) हा या सामन्यात भारताच्या सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक होता. वेगवान गोलंदाज प्रभाव पाडू शकत नव्हते तरी देखील रोहितने त्यांनाच संधी दिली. सामन्याच्या शेवटी रोहितच्या डावपेचांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कनेरियाने त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हटले की,“मैदानावर भारतीय कर्णधार रोहित शर्माने अनेक चुकीचे निर्णय घेतले. भारतात परतल्यानंतर तुम्ही वॉशिंग्टन सुंदरला गोलंदाजी करायला देणार होता का? तो काय करत होता हेच मला समजत नव्हते. सुंदरची पाच षटके बाकी होती. मुस्तफिजुर रहमान हा डावखुरा फलंदाज आहे आणि प्रत्येक अंडर-१६ किंवा अंडर-१८ क्रिकेटपटूला माहित असेल की डावखुऱ्या टेलेंडरविरुद्ध, जर तुम्ही ऑफस्पिनरला गोलंदाजी दिली तर तो तुम्हाला विकेट मिळवून देईल. सुंदरला चेंडू पृष्ठभागावर वळवायला मिळाला असता, पण रोहितने त्याला संधीच दिली नाही.”

हेही वाचा :   IND vs BAN: “जर केएल राहुलला विश्वचषक खेळायचा असेल तर…” हर्षा भोगलेंनी केले मोठे विधान

सुंदरने बांगलादेशचा कर्णधार लिटन दास (४१) आणि शकीब अल हसन (२९) यांच्या मोठ्या विकेट घेतल्या. मात्र, डावाच्या २६व्या षटकानंतर त्याने एकही चेंडू टाकला नाही. ढाका येथे टीम इंडियाच्या पराभवाचे प्रतिबिंब पाहून कनेरियाने सांगितले की, २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या तयारीच्या संदर्भात संघावर बरेच प्रश्नचिन्ह आहेत. अनेक चर्चा होत असल्या तरी अंमलबजावणीच्या स्वरूपात फारसे काही नाही, असा दावा त्यांनी केला आहे.

हेही वाचा :   IND vs BAN: “विश्वचषक २०२३ चा जिंकायचा असेल तर…” सुनील गावसकरांनी वरिष्ठ खेळाडूंवर डागली तोफ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने टिप्पणी करताना म्हटले की, “ही खूप वाईट, दयनीय कामगिरी होती. लक्षात ठेवा, भारत विश्वचषकाची तयारी करत आहेत. परंतु अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. त्यांचे सातत्यपूर्ण सलामीवीर कोण असतील? मधल्या फळीतील फलंदाज कोण असतील? गोलंदाज कोणत्या क्षेत्रात गोलंदाजी करतील? खूप चर्चा आहे, मात्र त्याची अंमलबजावणी योग्यरित्या करत नाही.” पहिला एकदिवसीय सामना गमावल्यानंतर, बुधवार, ७ डिसेंबर रोजी ढाका येथे होणार्‍या दुस-या सामन्यात यजमानांना सामोरे जाताना टीम इंडियाला जिंकणे आवश्यक आहे.