IND vs SA: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. या मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामना मंगळवारी दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर सुरु आहे, जिथे गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडत होता. आज मात्र पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तरी मैदान ओलसर असल्याने नाणेफेक उशिरा करण्यात आली. साधारण अर्धातास सामना उशिराने सुरु झाला. दिल्ली येथे खेळल्या जाणाऱ्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात जिंकणारा मालिका विजेता ठरणार आहे.

भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि तो गोलंदाजांनी खरा ठरवला. दक्षिण आफ्रिकेने आजच्या सामन्यात पुन्हा आपला कर्णधार बदलला. नाणेफेक करण्यासाठी डेव्हिड मिलर आला होता. गेल्या सामन्यातील कर्णधार केशव महाराज आजारी पडला असून आफ्रिकेने आपल्या संघात तीन बदल केले आहेत. आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. दिल्लीत दक्षिण आफ्रिका संघाची अवस्था इतकी वाईट झाली आहे की, अवघ्या ९४ धावांवर ८ फलंदाज तंबूत परतले आहेत. सलामीवीर क्विंटन डिकॉक आज फार काही करू शकला नाही वॉशिंग्टन सुंदरने त्याला ६ धावांवर माघारी धाडले. डिकॉक बाद झाल्यानंतर जानेमन मलान चांगला खेळताना दिसत होता. मात्र मोहम्मद सिराजने त्याला शॉर्ट बॉलवर आवेश खान करवी १५ धावांवर झेलबाद करत भारताला दुसरे यश मिळवून दिले.

दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या अडचणीत सापडला आहे. १० षटकांच्या पॉवरप्लेमध्ये संघाने ३ गडी गमावले आहेत. पॉवरप्लेच्या शेवटच्या चेंडूवर मोहम्मद सिराजने रीझा हेंड्रिक्सला बाद केले, त्याला २१ चेंडूत केवळ ३ धावा करता आल्या. सिराजने रिझाला रवी बिश्नोईकरवी झेलबाद केले. भारताने सामन्यावर पकड मिळवत पाहुण्या संघाला १३ षटकात केवळ ३५ धावा करता आल्या. दक्षिण आफ्रिकेचा चौथा गडी ९ धावा करणारा एडन मार्कराम शाहबाज अहमदच्या चेंडूवर यष्टीमागे संजू सॅमसन करवी झेलबाद झाला. दक्षिण आफ्रिकेने अद्याप ५० धावा केल्या नाहीत. संघ अडचणीत सापडला आहे. डावखुरा फिरकीपटू शाहबाज अहमदने दक्षिण आफ्रिकेला १६ व्या षटकात मोठा धक्का दिला.

हेही वाचा : T20 World Cup 2022: ख्रिस गेलचे भाकीत, विश्वचषकाची फायनल भारत-पाकिस्तानमध्ये नाही, तर ‘या’ दोन संघांमध्ये होणार

या सामन्यात कर्णधार असलेल्या डेव्हिड मिलरच्या रूपाने दक्षिण आफ्रिकेचा पाचवा गडी बाद झाल्याने होती नव्हती ती शेवटची आशा देखील मावळली. त्याला केवळ ७ धावा करता आल्या. वॉशिंग्टन सुंदरने त्याला त्रिफळाचीत केले. कुलदीप यादवने भारताला सहावे यश मिळवून दिले. त्याने अँडिले फेहलुकवायोला ८ धावांवर त्रिफळाचीत केले. आता सर्व जबाबदारी ही एकमेव फलंदाज हेन्रिक क्लासेनवर होती पण त्याला शाहबाज अहमदने बाद केले. आत्ता मात्र आफ्रिका १५० चा पल्ला तरी गाठू शकेल का अशी परिस्थिती आली आहे.