दुबई येथे आयोजित १९ वर्षांखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाने नेपाळवर ९ विकेट्सनी विजय मिळवला. कुलदीप यादवच्या भेदक माऱ्यासमोर नेपाळचा डाव १३६ धावांत संपुष्टात आला. कुलदीपने ३१ धावांत ५ बळी घेत नेपाळच्या एकाही फलंदाजाला स्थिरावू दिले नाही. करन कैला आणि सर्फराझ खानने प्रत्येकी २ बळी घेत कुलदीपला चांगली साथ दिली. नेपाळतर्फे बीभत्सू थापाने ४७, तर आरिफ शेखने ४० धावा केल्या. या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना महाराष्ट्राच्या अखिल हेरवाडकर आणि विजय झोल या जोडगोळीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या दोघांनी १३३ धावांची सलामी देत भारताच्या विजयाचा पाया रचला. अखिलने ८ चौकार आणि एका षटकारासह ७१ धावांची खेळी केली. विजय झोलने ९ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ६१ धावा केल्या.